मुंबईसह पाच जिल्ह्यांत लढणार
मुंबई - राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांनंतर वेळोवेळी सरकार आणि नेत्यांनी आश्वासने दिली. प्रत्यक्ष कृती न झाल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "राष्ट्रीय मराठा पार्टी' स्थापन करून पाच जिल्ह्यांत निवडणुका लढवणार असल्याचे मुंबईतील एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन विकास पाटील यांनी या पक्षात कार्याध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करणारे अंकुशराव पाटील या पक्षाचे अध्यक्ष आहेत. हिंदू सेना आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे बालाजी सूर्यवंशी, मराठवाडा वाळू संघटनेचे अध्यक्ष गीतेश सूर्यवंशी आणि विविध भागांतून आणि छोट्या-मोठ्या संघटनांतील नेत्यांनी एकत्र येऊन या पक्षाची स्थापना केली आहे. मुंबईत "प्रेस क्लब'मध्ये शनिवारी पत्रकार परिषदेत या पक्षाची औपचरिक घोषणा करण्यात आली.
मराठा नेते आणि राजकीय पक्षांनी आजवर केवळ राजकारण केले. मराठा समाजातील गरिबांच्या प्रगतीसाठी प्रत्यक्षात काहीच झाले नाही. आरक्षण, शेतकरी आत्महत्या, मराठा समाजातील गरीब कुटुंबांतील मुलांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. आजवर सत्तेत आलेल्या पक्षांनी केवळ राजकारण केले. समाजकारण करण्यासाठी आणि मराठ्यांसह ओबीसी व इतर समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी "राष्ट्रीय मराठा पार्टी' स्थापन करण्यात आली, असे पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.
तीन फेब्रुवारीपर्यंत उमेदवार जाहीर
अंकुशराव पाटील यांनी पक्षातर्फे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर या पाच जिल्ह्यांत निवडणुका लढवणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किती आणि कोणत्या जागांवरून निवडणूक लढवावी, हे ठरलेले नाही. 3 फेब्रुवारीपर्यंत पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.
|