नेरळ - कर्जत तालुक्यातील मोरेवाडी येथील एका दीड वर्षाच्या कुपोषित मुलीचा मृत्यू झाला आहे; तर तालुक्यात आणखी तीन बालके मृत्यूच्या दाढेत असून, 154 बालके कुपोषित आहेत. गेल्या दीड वर्षात दुसरे बालक कुपोषणाचे बळी ठरले आहे. दरम्यान, या भागात अनेक महिने पोषण आहार वाटपात अनियमितता असल्याचा आरोप होत आहे.
कर्जत तालुक्याचा अर्धा भाग आदिवासीबहुल असून, कुपोषणाची समस्या आहे. या भागात राज्य सरकारने बालउपचार केंद्रे सुरू केली आहेत. त्याचबरोबर विशेष पोषण आहाराचा पुरवठाही केला जातो. मात्र मोरेवाडी येथील 18 महिन्यांच्या सोनाली भास्कर पादीर हिचा 20 ऑक्टोबर रोजी कुपोषणाने मृत्यू झाला.
या भागातील अंगणवाडी सेविका वैशाली वारे यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला; तर अंगणवाडी मदतनीस रजेवर असल्याने 17 लहान बालके अंगणवाडीतील पोषण आहार आणि अन्य सोई-सुविधांपासून वंचित राहिली. त्यामुळेच अवघ्या दीड किलोच्या सोनालीचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.
अंगणवाडी बंद असल्यामुळे मोरेवाडीतील बालिकेचा मृत्यू झाला. कुपोषणात अडकलेली मुले ताडवाडीतील अंगणवाडीत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्वात आधी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाडी सुरू करावी.
- जयवंती हिंदोळा, सदस्या, कर्जत पंचायत समिती.
सोनाली हिचा मृत्यू आरोग्याच्या प्रश्नामुळे झाला आहे. तिचे वजन कमी होते; पण ती कुपोषित नव्हती. पाच ऑक्टोबरपर्यंत तिला घरी आहार पोचविला जात होता.
- निशिगंधा भवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास विभाग.
कर्जत तालुक्यातील कुपोषणाची स्थिती--
प्रकल्प 1 प्रकल्प 2
एकूण बालके- 7 हजार 158 9 हजार 838
सॅम बालके 13 16
मॅम बालके 32 83
कमी वजनाची बालके 496 502
कमी उंचीची बालके 129 91
|