मुंबई - जागतिक पातळीवर मोठी संधी असूनही पिछाडीवर असलेल्या शेती निर्यातवाढीसाठी केंद्र सरकारने नवे शेतीमाल धोरण निश्चित केले आहे. राज्य सरकारांनी त्यांच्या सूचना त्वरित पाठवाव्यात, त्यानंतर नवे धोरण तातडीने लागू केले जाईल, असे केंद्रीय वाणिज्य सचिव रिटा टिओटिया यांनी सांगितले.
कृषी व प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) आणि मुंबईतील पीएच.डी. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या संयुक्त सहकार्याने रिव्हर्स बायर-सेलर परिषदेत त्या बोलत होत्या. "अपेडा'चे अध्यक्ष डी. के. सिंग आणि विभागीय संचालक सुधांशू या वेळी उपस्थित होते. रिटा टिओटिया पुढे म्हणाल्या, 'निर्यातीसाठी समुद्राच्या मार्गाने कृषी उत्पादनांची निर्यात वाढली पाहिजे, त्यासाठी नवे संशोधन होऊन निर्यातदारांसाठी निर्यातमूल्य कमी झाले पाहिजे. तसेच देशात आंब्याच्या अनेक जातींचे उत्पादन होत असताना निर्यात केवळ दोन ते तीन वाणांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे "अपेडा'ने इतर आंब्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घ्यावा.''
|