एपीएमसीत आवक घटली

एपीएमसीत आवक घटली

नवी मुंबई - कर्जमाफी आणि योग्य बाजारभाव या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी गुरुवारपासून (ता. १) संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटवर दिसून आला. दररोज सकाळी येणाऱ्या ५०० ते ६०० मालगाड्यांच्या तुलनेत आज ४१५ गाड्यांची आवक झाली. संपाच्या एक दिवस आधी निघालेल्या गाड्याच बाजारात पोहचू शकल्या आहेत. हा संप सुरूच राहिल्यासही आवक घटून भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे केलेल्या कर्जमाफीच्या मागणीकडे अनेक दिवस दुर्लक्ष केल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांनी गुरुवारी पहाटेपासून सुरू केलेल्या संपाचा परिणाम नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटवर काही प्रमाणात दिसला. संपाच्या एक दिवस आधी शेतकऱ्यांनी पाठवलेला माल घेऊन ४१५ गाड्या पहाटे बाजारात दाखल झाल्या. भाजीपाला आल्याने नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. १०० गाड्यांची आवक कमी झाली आहे. पहाटे आंदोलन सुरू झाल्याने रस्त्यात असलेल्या गाड्या बाजारापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. शेतकऱ्यांचा संप सुरूच राहिल्यास बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन भाजीपाला महागण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत. फळ मार्केटमध्येही ३५० गाड्यांची आवक झाल्याचे माजी संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. यातील १५० गाड्या या आंब्याच्या होत्या.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतून रोज सकाळी ४० हजार क्विंटल भाजीपाला मुंबई व ठाणे येथील शेजारच्या उपनगरांना पाठवला जातो. शेतकऱ्यांचा संप असाच सुरू राहिला, तर रोज इतक्‍या प्रमाणातील मोठी मागणी पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे काही दिवसांनंतर मालाचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढण्याची शक्‍यता आहे.
- कैलास ताजणे, अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक व्यापारी महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com