नवी मुंबई - अवघ्या पंधरा दिवसांत कांद्याचे भाव उसळले असून, सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलो 40 रुपये होता. कांदा खरेदी करतानाच ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले असून, कांद्याचे भाव वाढत राहणार असल्याचे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
श्रावण सुरू झाल्यापासून कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सात ते आठ रुपये किलोपर्यंत कांदा घसरलेला होता; मात्र घाऊक बाजारात आठवड्यापूर्वी 10 ते 15, त्यानंतर 15 ते 20 आणि सध्या 20 ते 25 रुपयांपर्यंत पोचला. या वाढीचा किरकोळ बाजारावर परिणाम झाला असून, किरकोळ बाजारात कांद्याची 40 रुपये किलोने विक्री होत आहे.
कांद्याच्या बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना चढ्या भावानेच खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे मुंबईत आणखी काही काळ भाव तेजीत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाशीतील घाऊक बाजारात राज्यभरातून कांद्याच्या 131 गाड्या दाखल झाल्या.
|