मुंबई - काही पाकिस्तानी नागरिक मुंबईतून अचानक गायब झाले असून, तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पाकिस्तानी नागरिकांचा शोध महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) घेत आहे. शहरातील काही हॉटेल आणि लॉजची तपासणी केली जात आहे.
परदेशी नागरिक टुरिस्ट व्हिसावर मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर त्यांची नोंद पोलिसांकडे होते. दर महिन्याला टुरिस्ट व्हिसावर आलेल्यांची माहिती पोलिस अपडेट करत असतात. भारतात आल्यावर त्यांची छायाचित्रे आणि संपूर्ण माहिती पोलिसांकडे जमा केली जाते. नुकतेच जुहू परिसरातून काही पाकिस्तानी बेपत्ता झाल्याने तपास यंत्रणाची झोप उडाली आहे. ते नेमके कुठे गेले आहेत, याचा तपास सुरू आहे. त्यांना शोधण्याची जबाबदारी महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ते खरेच बेपत्ता झालेत का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काही महिन्यांपूर्वी एक पाकिस्तानी नागरिक मुंबईत आला होता. तो मुंबईत नातेवाइकांना न भेटता गुजरातला गेला होता. एटीएसने त्याचा शोध घेतला असता तो गुजरातमध्ये नातेवाइकांकडे गेल्याचे उघड झाले होते. कित्येकदा परदेशी नागरिक न सांगताच दुसऱ्या ठिकाणी जातात; पण परतीच्या प्रवासाच्या वेळी ते सापडत नाहीत, असे असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. बेपत्ता झालेल्या पाकिस्तानी नागरिकांचा एटीएसचे अधिकारी शोध घेत आहेत.
|