मुंबई - महात्मा फुले यांची पगडी ही समतावादी विचारधारेची आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा हा विचार आहे, त्याला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
महात्मा फुले यांच्या पगडीला विरोध असल्यास तसे शिवसेनेने जाहीर करावे, असेही मलिक म्हणाले. चार दिवसांपासून पगडीवर सगळे राजकारण सुरू आहे. शरद पवार यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पगडीचा वापर करा, असे सुचवले आहे. आमचा पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आहे. या विचाराला जे काही लोक घाबरत आहेत, ते प्रतिगामी आहेत, असा आरोप मलिक यांनी केला.
समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे. मागासवर्गीय, ओबीसी, समाजातील खालच्या थरातील लोकांना शक्ती मिळाली पाहिजे, अशी "राष्ट्रवादी'ची भूमिका आहे, ती काहींना मान्य नाही, असा टोलाही मलिक यांनी शिवसेनेला लगावला. शिवसेनेचा मंडल आयोग, महिला आरक्षणाला विरोध होता. त्यांना सावरकर यांचे विचार पुढे न्यायचे असतील तर त्यांनी तसेच करावे, असा सल्लाही मलिक यांनी दिला.
|