मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावर रुळाचे तुकडे आडवे ठेवून घातपात घडवण्याचे प्रयत्न झाले असतानाच महाराष्ट्र पोलिसांनीही रेल्वेला "रेड अलर्ट' दिला आहे. याबाबत पोलिसांनी रेल्वेला पत्र पाठवले असून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. भोपाळ व कानपूर रेल्वे दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रेल्वेला दक्षतेचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेल्वेमार्गांवर रुळांचे तुकडे आणि दगड ठेवण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने रुळांशेजारी अस्ताव्यस्त पडलेले स्लीपर, रुळांचे तुकडे व मोठे दगड हटवण्यास सुरवात केली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील 11 हजार टनांपैकी सात हजार टन, तर पश्चिम रेल्वेवर 10 हजार टनांपैकी आठ हजार टनांपेक्षा अधिक रुळांचे तुकडे हटवण्यात आले आहेत; तरीही काही ठिकाणी ते पडून असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. राज्य पोलिसांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
पोलिसांनी पत्राद्वारे तीन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. रेल्वे परिसरात भिकारी आणि फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. रेल्वे स्थानक आणि मार्गावर गस्त वाढवावी, अशी सूचनाही पोलिसांनी रेल्वेला केली आहे.
|