मुंबई - निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे हक्काचे मतदान गमवावे लागलेले उमेदवार निवडणूक प्रक्रियेलाच न्यायालयात अव्हान देण्याच्या तयारीत आहेत. महापालिका निवडणुकीत मुंबईतील तब्बल 11 लाख मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने उमेदवारांसह मतदारही संतापले होते. अशा परिस्थितीत निसटता पराभव पदरी पडणारे उमेदवार निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीसाठी अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार याद्यातून 11 लाख मतदार गायब झाले आहेत. कुर्ला (प) येथील प्रभाग क्रमांक 165 मधील जगवाणी चाळ, गौरीशंकरनगर, उत्तरभारती सोसायटी याठिकाणच्या आमच्या हक्काच्या 2200 मतदारांची नावे गायब झाली आहेत. त्यामुळे निवडणुकीचा आमचा गडच डासळला आहे असे स्थानिक उमेदवार केतन बडगुजर यांनी सांगितले. मात्र या सर्व प्रक्रियेला आम्ही निकालानंतर न्यायालयात आव्हान देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे याबाबत मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
कुर्ला, मालाड, बोरिवली, वरळी आणि घाटकोपरमधील मतदारसंघांमध्ये नावे गायब असलेल्या मतदारांची संख्या अधिक होती. यापैकी अनेक मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीला मतदान केले होते. परंतु, या वेळी मात्र मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागले.
|