मुंबई - दहिसर नदीपात्रातील वाढत्या जलप्रदूषणात भर टाकणाऱ्या झोपडपट्ट्या, कचरा, पालिकेकडून नदीपात्रात सुरू असणारे कॉंक्रिटीकरण या समस्यांनी ग्रासलेल्या "रिव्हर मार्च'च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांची भेट घेतली.
मुंबईतील नद्या वाचवण्यासाठी "रिव्हर मार्च' दहिसर आणि पोईसर नदीपात्रातील कचरा उचलत आहे. नुकताच पोईसर नदीपात्रातून तब्बल 16 हजार किलोपेक्षा जास्त कचरा या कार्यकर्त्यांनी उचलला.
नदीपात्राजवळच्या झोपड्या व तबेल्यांमुळे नदी प्रदूषित होत आहे. अडीच वर्षांपासून मुंबईतील नद्या वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती फडणवीस यांना देण्यात आली.
गेल्या आठवड्यात पालिका अधिकाऱ्यांसोबत "रिव्हर मार्च'ने बैठक घेतली. त्या वेळी दहिसर नदीपात्रात शेण सोडणाऱ्या तबेलामालकांना 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. 10 वर्षांहून अधिक काळ प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल "रिव्हर मार्च'चे गोपाळ झवेरी यांनी विचारला. नद्या वाचवण्याच्या कार्याला आपला पाठिंबा असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. त्या लवकरच नद्यांची पाहणी करणार आहेत, असे "रिव्हर मार्च'चे अधिकारी विक्रम छोगले यांनी सांगितले.
|