संरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा डॉक्टरांचा निर्धार
मुंबई - दुसऱ्या दिवशीही राज्यातील डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णांचे हाल झाले. काही रुग्णालयांत फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. काही रुग्णालयांतील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
धुळे, नाशिक, औरंगाबाद व मुंबईतील शीव येथील टिळक रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी स्वतःहून "मास बंक'चा निर्णय घेतला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या डॉक्टरांनी केला आहे.
कामावर न जाण्याचा निर्णय वैयक्तिक पातळीवर घेण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था न झाल्यास कामावर जायचे की नाही हा प्रत्येक डॉक्टरचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मत व्यक्त होत आहे. संध्याकाळी पत्रकार परिषदेत इंडियन मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. पार्थिव सिंघवी यांनी डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा व्हावी, अशी तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
सोमवारी महापौरांनी रुग्णालयांत 300 सशस्त्र पोलिस ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. निवासी डॉक्टरांनी न्यायालयाचा अवमान केलेला नसून कोणत्याही संघटनेने हा संप पुकारलेला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर संघटनेचे सरचिटणीस डॉ. स्वप्नील मेश्राम यांनी सांगितले.
असंतोषाची कारणे
- संवेदनशील ठिकाणी सशस्त्र सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन जून 2016 मध्ये देण्यात आले होते. परंतु, नऊ महिन्यांनंतरही त्याची पूर्तता नाही.
- अलार्म सिस्टीम बसवण्याचे 2011 मध्ये मान्य केल्यानंतरही दुर्लक्ष.
- रुग्णालयांत जास्त नातेवाइकांना प्रवेश देऊ नये ही मागणीही अधांतरीच.
- टिळक रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची 24 तासांत सुटका.
"मास बंक'नंतरच्या घडामोडी
- मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी डॉक्टरांची भेट घेतली. सशस्त्र पोलिस देण्याचे आश्वासन.
- वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांसोबत निवासी डॉक्टरांची बैठक.
- कामगारांसारखे वागू नका, असे न्यायालयाचे ताशेरे.
झालेल्या शस्त्रक्रिया
जे.जे.- 166
के.ई.एम.- 61 (43 मोठ्या शस्त्रक्रिया)
जी.टी.- 11 शस्त्रक्रिया (8 मोठ्या शस्त्रक्रिया)
नायर- आपत्कालीन शस्त्रक्रिया झाल्या. प्रसूती कक्षही सुरूच.
|