मुंबई - आजपर्यंत युतीच्या राजकारणात शिवसेनेनं मोठं मन दाखविले त्यामुळे, राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला संधी मिळाली नाही. त्यामुळे आता "सगळीकडे भगवा' या निर्धाराने महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची शपथ युवा सेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांनी आज घेतली. शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेनेला आता यापुढे सर्वत्रच स्वबळावर लढायचे आहे. स्वबळानेच महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायची आहे. असे स्पष्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले, की आपल्याला केवळ मतं जिंकायची नाहीत, तर सामान्य जनतेची मनंदेखील जिंकायची आहेत. तन आणि मन लावून शिवसैनिक सतत लढत असतात. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची शपथ मी या मंचावरून घेतो आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी कायम तुम्हा सगळ्यांसोबत आहोत.''
डहाणूला जी पोटनिवडणूक झाली तेव्हा सगळ्यांना असे वाटले होते, की आपण ऐनवेळी अर्ज मागे घेणार. मात्र तसे घडले नाही आपण त्वेषाने लढलो. साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरणाऱ्यांचा विजय झाला. पण अडीच लाख मते आपण मिळवू शकलो. आजपर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचा कधीही उमेदवार नव्हता. त्यामुळे यापुढे जिथे शिवसेनेला कधीही संधी मिळाली नाही, त्या ठिकाणी स्वबळाच्या निर्णयाने संधी मिळणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
|