मुंबई - नवी मुंबईतील नेरूळ येथील स्वप्नील सोनावणे खूनप्रकरणी 13 आरोपींना अटक केली असून, त्यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय समाजातील अत्याचारांबाबत निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पार्श्वभूमीवर सोनावणे खून प्रकरणात आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करणारी याचिका सोनावणे याच्या निकटवर्तीयांनी केली आहे. याबाबत राज्य सरकार अंमलबजावणी करत आहे, असे सरकारी वकिलांनी मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सांगितले. सोनावणेच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा दिल्याचा दावाही त्यांनी केला. राज्य सरकारने याचिकाकर्त्यांच्या मागण्यांची पूर्तता केलेली आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका निकाली काढली. प्रेमसंबंधातून सोनावणेचा खून झाला होती. पोलिसांनी आरोपींवर जातीवाचक शिवीगाळ, खून, अपहरण आदी आरोप ठेवले आहेत.
|