ध्वनिप्रदूषणामुळे मुलांना सांभाळणे कठीण होतेय 

ध्वनिप्रदूषणामुळे मुलांना सांभाळणे कठीण होतेय 

मुंबई : वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले, युवावर्गालाही जाणवू लागला आहे. वाढत्या गोंगाटामुळे स्वभावातील आकस्मिक बदल, चिडचिडेपणा यामुळे मुलांना सांभाळणे कठीण होत असल्याची तक्रार महिलांनी मांडली आहे.

विशेषतः सण-उत्सवांत हा त्रास अधिक होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे सर्वच वयोगटांतील मानसिक संतुलन जास्त बिघडत असल्याचे निरीक्षण 'सकाळ'च्या सर्वेक्षणाने मांडले आहे. 

काही महिन्यांचे मूल ते 10 वर्षे वयोगटाच्या मुलांमध्ये सण-उत्सवांदरम्यान वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या बदलांची माहिती महिलांकडून घेण्यात आली. त्यात वयोवृद्धांपेक्षाही घरातील लहान मुलांना सांभाळण्याचे आव्हान या कालावधीत कठीण होत असल्याचे सांगून त्यांनी चिंता व्यक्त केली. घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती रक्तदाबाचा त्रास, डोकेदुखी यातून ध्वनिप्रदूषणामुळे हा त्रास होत असल्याचे स्पष्ट करू शकतात; मात्र अगदी छोटी मुले केवळ रडण्यातून व्यक्त होतात; मग मूल बोलते झाले असले तरीही आवाजाच्या असह्यतेची भावना चिडचिडेपणातूनच व्यक्त करते.

मुलांच्या संगोपनात ध्वनिप्रदूषण हा मोठा अडथळा ठरत असल्याची तक्रार महिलावर्गाने केली. 

त्यातच घरात वडीलधारी व्यक्ती असल्यास संपूर्ण घरातच चिडचिडेपणा जाणवतो. दैनंदिन कामातही त्यामुळे अडथळा निर्माण होतो. सण-उत्सवांत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्याने मानसिक व शारीरिक त्रासात भर पडत असल्याची तक्रारही ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने केली. दिवाळी, गणपती या उत्सवांत आजही आवाजाच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन होते. याबाबतच्या तक्रारींवर कारवाईही होत नसल्याची खंत 'आवाज फाऊंडेशन'च्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली यांनी केली. ध्वनिप्रदूषणाची समस्या पूर्णतः नष्ट करायची असल्यास सर्वांनी आवाजाची मर्यादा पाळायला हवी असे आवाहनही त्यांनी केले. 

सर्वेक्षणातील काही ठळक मुद्दे

  • गणपतीच्या सणात ध्वनिप्रदूषणाचा त्रास जास्त जाणवतो. दर दिवाळीत आवाजाची पातळी जास्त असल्याचे दिसते. 
  • सण-उत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात कारवाई होताना पाहिलेले नाही. 
  • वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे सर्वच वयोगटांतील मानसिक संतुलन जास्त बिघडते. 

सर्वेक्षणातील वयोगट 

  • गृहिणी- 25 ते 35 वर्षे 
  • ज्येष्ठ नागरिक- 60 ते 70 वर्षे 

युवावर्गातही श्रवणक्षमतेच्या तक्रारी 
20 ते 25 वयोगटातील तरुणवर्गामध्ये श्रवणक्षमतेच्या तक्रारी वाढत असल्याची माहिती नायर रुग्णालयाच्या ईएनटीप्रमुख डॉ. बाची हातीराम यांनी दिली. सुदैवाने योग्य वेळीच श्रवणक्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याची जाणीव युवावर्गाला होत आहे. त्यामुळे वेळीच केलेल्या उपचारांनी येऊ शकणारा कायमस्वरूपी बहिरेपणा टाळता येतो, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com