सर्व धार्मिक स्थळांना स्पीकर परवानगी आवश्‍यक

सर्व धार्मिक स्थळांना स्पीकर परवानगी आवश्‍यक
सर्व धार्मिक स्थळांना स्पीकर परवानगी आवश्‍यक

मुंबई - सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिवर्धक लावण्यासाठी पोलिस परवानगी घ्यावीच लागेल. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणाचे कायदे आणि नियमही काटेकोरपणे पाळावे लागतील. संमती असली तरीही रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. ते वापरणे हा आमचा घटनात्मक धार्मिक हक्क आहे, असा दावा कोणताही धर्म करू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 16) दिला. 

मशिदींवरील विनापरवाना ध्वनिवर्धकांविरुद्ध नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ते संतोष पाचलग यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. अमजद सैयद यांनी हा निर्वाळा दिला. 

महाराष्ट्र पोलिस कायदा वा अन्य कायद्यांनुसार ध्वनिवर्धक लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे ती धार्मिक स्थळांनीही घेतलीच पाहिजे. परवाना घेतला तरीही रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत ध्वनिवर्धक लावता येणार नाहीत. सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिप्रदूषणाचा कायदा लागू होतो. त्यांनी कायद्याचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. शांतता क्षेत्र (सायलेन्स झोन) विषयक कायदाही सर्व धार्मिक स्थळांना लागू आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

धार्मिक स्थळांच्या परिसरात सायलेन्स झोन असेल तर त्यांच्या कार्यक्रमांचा मोठा आवाज बाहेर जाता कामा नये, असे खंडपीठाने यापूर्वीच निकालपत्रात म्हटले होते. सायलेन्स झोनमधील धार्मिक स्थळे आपल्या बंद सभागृहात किंवा आवारातही परवानगी घेऊन ध्वनिवर्धक लावू शकतील. मात्र, त्यांचा आवाज सायलेन्स झोनमध्ये जाता कामा नये, असेही आदेशात म्हटले आहे. 

आदेश काय म्हणतो? 

- सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिप्रदूषण कायदे, नियम पाळणे बंधनकारक 

- धार्मिक स्थळांनीही रात्री 10 ते पहाटे 6 ध्वनिवर्धक वापरू नयेत 

- ध्वनिवर्धक वापरणे हा घटनात्मक धार्मिक अधिकार असल्याचा दावा करू नये 

- धार्मिक स्थळांनीही ध्वनिवर्धकासाठी परवानगी घेणे आवश्‍यक 

- शांतताक्षेत्रविषयक कायदाही सर्व धार्मिक स्थळांना लागू 

जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार नकोत 

ध्वनिवर्धक वापरण्याची मुदत रात्री दहापर्यंत आहे; परंतु राज्य सरकार वर्षातले 15 दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक लावण्याची परवानगी देऊ शकते; परंतु या 15 दिवसांपैकी तीन दिवस ध्वनिवर्धक लावण्याची परवानगी देण्याचा अधिकार सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना देऊ नये. बंद सभागृहे (चित्रपटगृहांमधील ध्वनिवर्धक) मात्र या नियमाला अपवाद आहेत. 

आपत्कालीन परिस्थिती 

साधारणपणे रात्री 10 आणि 12 वाजल्यानंतर ध्वनिवर्धक वापरू नयेत, असा नियम आहे; परंतु त्यास आपत्कालीन परिस्थितीचा अपवाद आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत रात्री दहानंतरही ध्वनिवर्धक वापरता येतील, असे खंडपीठाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com