मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधकाम पूर्ण झालेल्या सुमारे 35 हजार सदनिकांना ओ.सी. (भोगवटा प्रमाणपत्र) देण्यासाठी विशेष पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय एसआरए प्राधिकरणाने घेतला आहे. ही विशेष मोहीम 7 मार्चपासून सुरू होईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी नुकताच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा आढावा घेतला. यात मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक योजना पूर्ण झाल्या असल्या, तरी त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळणे शिल्लक असल्याचे आढळले. विशेषतः संबंधित विकसक, तसेच काही सोसायट्यांमधील वाद वा अन्य कारणे त्यामागे आहेत. त्यामुळे संबंधित सदनिकाधारकांना दुप्पट कर भरण्यासारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, ही बाब विश्वास पाटील यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले. भोगवटा प्रमाणपत्राच्या संदर्भात आढावा घेण्याचे काम याआधीच एसआरएने सुरू केले आहे. प्रत्यक्ष मोहिमेस पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. यासंदर्भात एसआरएने एक खास कक्ष उघडला असून, नागरिकांनी त्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास प्राधिकरणातील सं. शि. पाटील (कक्ष अधिकारी) व भारती प्रभुदेसाई (मुख्य लिपीक) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
|