मुंबई - एसआरए योजनेतील विकलेली घरे शुल्क आकारून नियमित करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
एसआरए स्कीममधील घरे किमान दहा वर्षे विकता येत नाहीत. मात्र काही रहिवाशांनी अशी घरे विकली असून विकत घेणारे रहिवासी अडचणीत सापडले आहेत. प्रकाश महेता यांच्या माहितीनुसार या योजनेतील घरे ज्यांनी खरेदी केली आहेत, त्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. एसआरएअंतर्गत घर मिळाल्यानंतर, ज्यांनी ती घरे खरेदी केली,
त्यांच्याकडून हस्तांतर फी आकारली जाणार आहे. त्यानंतर ही हस्तांतर प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर करण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत विधी व न्याय विभागाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे महेता यांनी सांगितले. मुंबईत आजपर्यंत 63 हजार एसआरएची घरे बेकायदेशीररीत्या विकण्यात आली आहेत. एसआरएची घरे दहा वर्षे विकू शकत नाही, अशी अट असतानाही ती विकली. ज्यांनी ती घरे विकत घेतली, त्यांची घरे सील करून ताब्यात घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचा आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महेता यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत विधी व न्याय विभागाशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
|