सहा रुपयांत जेवण, लवकरच राज्यभरात विस्तार
मुंबई - कर्नाटकातील "इंदिरा किचन'च्या धर्तीवर बदलापूर येथे "ताईचं किचन'ची सुरवात होणार आहे. सामान्य, गरजू व कामगारवर्गाला सकस व परिपूर्ण आहार मिळावा असा यामागचा हेतू असून, केवळ सहा रुपयांत जेवण देण्याचा हा उपक्रम आहे. बदलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम 22 तारखेला सुरू होत आहे.
प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर बदलापूरमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात विस्तार करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत चार रुपयांस भाजी व दोन रुपयांना पोळी असे सहा रुपयांत जेवण देण्याची संकल्पना आहे. यासाठी महिला बचत गटांकडून हा आहार खरेदी केला जाणार असून, त्यामुळे महिला बचत गटांनाही रोजगार व सक्षमीकरणाची संधी मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटाची चळवळ उभारली आहे. या बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली. याचाच धागा पकडून दामले यांनी "ताईचं किचन'ही संकल्पना राबवण्याचा निर्धार केला आहे.
|