ठाणे - ठाण्यातील कशिश पार्क येथील प्रवेशद्वारावर भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण हा आपल्याविरोधातील कटाचा एक भाग आहे. या प्रकरणी खोट्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्याचे निवेदन शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहे.
या संदर्भात रेपाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनास्थळावरील सीसी टीव्ही फुटेज दाखवून कोणावरही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले. घटनास्थळी सुखरूप असलेल्या कार्यकर्त्यांनीच पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी स्वत:वर वार करून खोटी तक्रार केली. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या आई-वडिलांना शिवीगाळही केल्याचा आरोप रेपाळे यांनी केला आहे. या प्रकरणी भाजपच्या सागर मेटकरी यांनी तक्रार दाखल केली होती, तर विकास रेपाळेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर ठिय्या मांडला होता.
घटनास्थळावर कोणत्याही प्रकारचा चाकू हल्ला झाला नाही. तर मेटकरी यांनी स्वत: भिंतीवर डोके आपटून घेत असल्याचे चित्रीकरण पोलिसांना देण्यात आले आहे.
|