ठाणे पालिका आयुक्तांना धमकी 

ठाणे पालिका आयुक्तांना धमकी 

ठाणे - ठाणे पालिका दलाल आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनली होती. या दलालांच्या तावडीतून शहराची सुटका व्हावी, तसेच एक चांगले शहर व्हावे यासाठी संजीव जयस्वाल यांच्यासारखा एक चांगला अधिकारी येथे पाठवला. त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यापर्यंत काही जणांची मजल गेल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील प्रचारसभेत केला. जयस्वाल यांना संरक्षण देऊन त्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहून ठाण्याचा विकास साधल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

संजीव जयस्वाल यांना मुख्यमंत्री कार्यालयाऐवजी ठाण्यात पाठवले. शहराचा विकास करताना पहिल्या दोन महिन्यात त्यांना येथील भ्रष्ट मंडळींकडून खूप त्रास देण्यात आला. ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्या वेळी स्वतः जयस्वाल यांनी रात्री १२.३० वाजता फोन करून मला याबाबतची माहिती दिली. त्या वेळेपासून त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिलो. मुख्यमंत्री म्हणून मी पोलिस आयुक्‍तांना कळवून त्यांना संरक्षण दिले. धोरण राबवताना राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहे. जयस्वाल तुम्ही घाबरू नका, असा आत्मविश्‍वास त्यांना दिला. या भूमिकेमुळेच आम्ही आज ठाण्याचा विकास साधू शकलो; पण याचे श्रेय आयुक्तांना त्रास देणारे घेत आहेत, याबद्दल आश्‍चर्य वाटत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दलालांच्या विळख्यात असलेल्या पालिकेला मुक्‍त करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. आम्हाला गुंडांचा पक्ष म्हणून हिणवणाऱ्या शिवसेनेने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले २० उमेदवार दिल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. शहराचा विकास करण्याऐवजी इथल्या सत्ताधाऱ्यांनी टेंडर व टक्‍केवारीत धन्यता मानली. त्यामुळे ३०० कोटींचा मलनिःसारण प्रकल्प एक हजार कोटींवर गेला आहे. भाजपची सत्ता पालिकेत आल्यास सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते पाणी उद्योग, तसेच पिण्यासाठी देऊ; तसेच २०१९ पर्यंत सांडपाण्याचा एकही थेंब विनाप्रक्रिया खाडीत जाणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवसेनेने प्रकल्प रखडवला आणि सत्तेत राहून शहर बकाल केले. खाडी प्रदूषित केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

तुम्ही काय केले?
कोपरी पूल आठ पदरी करण्यासाठी एमएमआरडीए निधी देत आहे. घोडबंदर बायपाससह कोस्टल रोडसाठी पुढाकार घेतला आहे. ठाण्यातील क्‍लस्टर विकासाचा विषय मार्गी लावला, दिल्ली मेट्रोच्या मदतीने मेट्रोचे जाळे आम्ही विणत आहोत. सुरक्षित ठाण्यासाठी सीसी टीव्हीचे जाळे उभे केले जात आहे. रो रो सेवा राबवीत आहोत अशा सगळ्याच गोष्टी आम्ही करता आहोत; मग तुम्ही ठाण्यात सत्तेमध्ये राहून काय केले, असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी या वेळी विचारला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com