धरणातील साठ्यात वाढ

धरणातील साठ्यात वाढ

ठाणे - जुलैच्या सुरुवातीला काहीशी उसंत घेणाऱ्या पावसाने पुन्हा दमदार आगमन केले आहे. शुक्रवारपासून पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्रोतातील एक स्रोत म्हणजे बारवी धरण. या धरणाची पाण्याची पातळी ही ७३.७६ टक्के म्हणजेच धरणात सध्या १७१.९२ दशलक्ष घनमीटर साठा आहे. मोडकसागर धरण १०० टक्के भरले असून, भातसा धरण ६६.८१ टक्के भरल्याने ठाणे व मुंबईचा पाणीप्रश्‍न लवकरच निकालात निघेल. पावसाचा जोर असाच राहिल्यास महिनाअखेरीस जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरतील, असा विश्‍वास लघुपाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने जूनमध्ये दमदार आगमन केल्याने जुलैच्या मध्यात धरणातील साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. शहराबरोबरच धरण परिसरातही चांगला पाऊस पडत असल्याने यंदा टंचाईचा सामना करावा लागणार नाही. जुलैच्या सुरुवातीला पावसाने थोडी उसंत घेतल्याने धरणे भरण्यास यंदाही ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून, धरण क्षेत्र परिसरातही पाऊस चांगला होत आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या तसेच मुंबई व ठाणे महापालिकेच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या भातसा धरणात ६२९.४२ दलघमी साठा असून, हे धरण ६६.८१ टक्के भरले आहे. रविवारी या परिसरात ५८ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा पाणीपुरवठ्याचा स्रोत असलेल्या बारवी धरण क्षेत्रात रविवारी ७५ मिमी पावसाची नोंद झाली असून, धरण ७३.७६ टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील आंध्र धरणात सर्वांत कमी पाणीसाठा असून, ४६.४४ टक्के धरण भरले आहे. रविवारी याच धरण परिसरात सर्वांत जास्त म्हणजेच १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com