ठाण्यातील नैसर्गिक जलस्त्रोतांमधील पाण्याची गुणवत्ता काय?

ठाण्यातील नैसर्गिक जलस्त्रोतांमधील पाण्याची गुणवत्ता काय?

ठाणे : कळव्यातील विहिरीतील दुषित पाण्यामुळे सात कासवांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील विहीरींमधील पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक जलस्त्रोत प्रदुषित अवस्थेत असून त्यामध्ये कचरा, ड्रेनेज पाणी आणि प्रदुषित पाणीही झिरपू लागले आहे. त्यामुळे शहरातील विहिरींची आणि तलावांच्या पाण्याची गुणवत्ता घसरू लागली आहे. हे पाणी जलचरांनाही घातक ठरू लागल्याने नागरिकांच्या वापरासाठीही त्याचा कधीच उपयोग होत नाही. त्यामुळे कळव्यातील या विहीरमध्ये उतरून तेथील कासवांच्या बचावासाठी प्रयत्न केलेल्या वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्यावतीने आता शहरातील जलस्त्रोतांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाशी प्राथमिक पातळीवर चर्चा झाली असून के. जी. सोमय्या महाविद्यालयाच्यावतीनेही या प्रकल्पावर काम करण्याच्या दृष्टीने सहमती देण्यात आली आहे.   

कळव्यातील हनुमान मंदिर परिसरातील विहीरीमध्ये काही कासवांचा मृत्यू झाल्याची माहिती गुरूवारी वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. या भागातील या विहीरीमध्ये उतरून तरूणांनी या विहिरीमध्ये जिवंत कासवानां वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. विहिरीमधील पाण्याची अवस्था अत्यंत प्रदुषित झाल्याचे या स्वयंसेवकांच्या निदर्शनात आले होते. विहिरीतील पाण्यामध्ये मुळ जलस्त्रोत नष्ट झालेले होते तर परिसरातील गटार, मलनिस्सारण वाहिन्यांमधून येणारे अत्यंत प्रदुषित पाणी यामध्ये सोडलेले होते. त्यात विहीरीमध्ये असलेल्या कासवांना खाद्या म्हणून नागरिकांकडून अन्नपदार्थ, मासांचे तुकडे टाकले होते. सडलेल्या या मासामुळे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त झाले होते. मेलेल्या सात कासवांच्या पाठिवरचे कवचही सडून गेल्यामुळे या कासवांचे शवविच्छेदन करणेही अडचणीचे बनले होते. त्यातील जिंवत कासवांना काढण्यात यश आले असले तरी यामुळे शहरातील विहीरीतील पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे या विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी संकलित करण्यात आले आहेत.

या विहिरींतील पाण्याची गुणवत्ता कळणार असली तरी शहरातील अन्य भागातील तलाव आणि विहिरींतील पाण्याची गुणवत्ता तपासणेही महत्वाचे ठरू लागले आहे. त्यामुळे वल्डवाईल्ड संस्थेच्या स्वयंसेवकांनी ठाणे शहरातील जलस्त्रोतांमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा करण्यात आली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटून त्यांच्या समोर याची माहिती दिली जाणार आहे. तर मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाचे पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. संजय जोशी यांनी या उपक्रमामध्ये लागणाऱ्या रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एमएस्सीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या आदित्य पाटील यांनी दिली. 

विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकण्यासाठी उपक्रम...
कळव्यातील घटनेमुळे या शहरातील जलस्त्रोतांची तपासणी करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या पर्यावरण शास्त्र विभागाने घेतला आहे. यामाध्यमातून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची गुणवत्ता शास्त्रोक्त पध्दतीने तपासण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचा वापर त्यासाठी करता येईल तसेच या विहिरींची संख्या मोठी असल्यास त्यासाठी महापालिका आणि अन्य प्रायोजकांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी करता येईल. महाविद्यालयातील एमएस्सीच्या शेवटच्या वर्षामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पावर काम करता येणार असून शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष अनुभवही घेता येऊ शकणार आहे. यासाठी सध्या प्राथमिक स्थरावर प्रयत्न सुरू आहे. याविषयी लवकर नियोजन करण्यात येणार असून महाविद्यालयातील विद्यार्थी, वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक आणि महापालिकेच्या मदतीने हा उपक्रम पुर्ण करण्याचा मानस आहे. 
प्रा. डाॅ. संजय जोशी, पर्यावरण शास्त्र विभाग, के. जे. सोमय्या महाविद्यालय, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com