मुंबई - प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी असलेली "वाहन-4' ही संगणक प्रणाली आता ठाणे आरटीओच्या उंबरठ्यापर्यंत पोहचली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही प्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व व्यवहार ऑनलाईन होतील. पण, मुंबईतील आरटीओ कार्यालयाप्रमाणे गोंधळ तर होणार नाही ना, अशी भीती अधिकाऱ्यांना सतावत आहे.
देशभरातील आरटीओ कार्यालयांचे दैनंदिन व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी वाहन-4 ही संगणकीय प्रणाली अवलंबली जात आहे. मुंबईसह राज्याच्या काही आरटीओमध्ये वाहन-4 मधील त्रुटींमुळे फटका बसला आहे. दिल्लीतील नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी)ने ही यंत्रणा प्रत्यक्षात आरटीओ कार्यालयात बसवली आहे. पण, राज्याच्या विशेषत: मुंबईतील परिवहनाशी संबंधित बाबी या संगकीय प्रणालीमध्ये अपडेट नसल्याने अधिकाऱ्यांबरोबर वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. आता परिवहन मुख्यालयातून एनआयसीला वारंवार चुका लक्षात आणून दिल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार सुरळीत झाले आहेत.
मुंबईतील वडाळा व मुंबई सेंट्रल आरटीओमधील वाहन-4 नंतर आता ठाणे आरटीओचा क्रमांक लागणार आहे. अवजड वाहने, टुरिस्ट बसेस, रिक्षा व वाहनांची संख्या लक्षात घेता, वाहन-4 ची अंमलबजावणी आरटीओला डोकेदुखी ठरणार आहे.
आमची तयारी पूर्ण झाली आहे. कुठलीही समस्या येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पण, जर आरटीओचा जुना डेटा स्थलांतरीत झाला नाही तर काही समस्या उद्भवू शकते, असे पुण्यातील एनआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
|