मुंबई - रिसॉर्ट, वॉटर पार्क किंवा थीम पार्कमध्ये सवलत मिळत असली, तरी अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानोपयोगी गोष्टी मिळतील तेथेच सहली काढाव्यात, असा आदेश शिक्षण विभागाने शनिवारी काढला.
राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी शैक्षणिक सहली काढाव्यात, अशी विनंती पर्यटन विभागाने शालेय शिक्षण विभागाला केली होती. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व मंडळांतील पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांना हा आदेश काढला आहे. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान मिळावे, त्यांना भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक गोष्टी पाहता याव्यात, यासाठी त्यांची वर्षाकाठी एक शैक्षणिक सहल काढावी किंवा ग्रामीण भागात त्यांना पर्यटन घडवावे, असेही या आदेशात म्हटले आहे. शाळांनी विद्यार्थ्यांवर अशा सहलींची सक्ती करू नये. सहलीला जाण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची संमती घेणे आवश्यक आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शाळांनी ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सहली काढल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. शिवाय राज्यातील पर्यटनालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया मुंबई शिक्षक परिषदेचे पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली. दरम्यान, सहलींविषयीच्या या आदेशात सुरक्षिततेविषयी काहीही उल्लेख नसल्याने "फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन' या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
|