उल्हासनगर - मणप्पुरम गोल्ड लोनच्या कार्यालयात नागरिकांनी तारण ठेवलेले दागिने चोरीस गेले होते. ते परत दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता करण्याऐवजी दागिन्यन्नवर चक्रवाढ व्याज वसूल केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यावर शिवसेनेने हे कार्यालय बंद पाडले आहे.
शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना गटनेते रमेश चव्हाण, नगरसेविका ज्योती माने, ज्योत्स्ना जाधव, माजी नगरसेवक सुरेश जाधव, नगरसेवक सुमित सोनकांबळे, शाखाप्रमुख राजू शिंदे, युवा सेनेचे छोटू माने आदींनी यात भाग घेऊन विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. किमान 550 नागरिक मणप्पुरमची तक्रार करणार आहेत. डिसेंबर 2016 मध्ये 7 करोड 22 लाख 40 हजार 305 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेले होते.
याप्रकरणी गुन्हे शाखा ठाणे युनिट व उल्हासनगर युनिट व विठ्ठलवाडी पोलिसांनी काही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 77 लाख 27 हजार 562 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ग्राहकांचे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्यावर मणीप्पुरम फायनान्स लिमिटेडने त्या ग्राहकांना घेतलेल्या कर्जावर व्याज घेण्यात येणार नाही, असे सांगितले होते; पण या कार्यालयामार्फत कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात व्याजासह रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. बऱ्याच नागरिकांनी सोने मिळण्याच्या अपेक्षेने चक्रवाढ व्याजासह पैसे भरूनही त्यांना सोने परत मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यावर शिवसेनेने मणप्पुरम बंद पाडून विठ्ठलवाडी पोलिसांना विषय कळवला आहे. नागरिक आता रीतसर तक्रार करणार असल्याची माहिती रमेश चव्हाण, ज्योती माने यांनी दिली.
|