मुंबई - गुढीपाडव्यानिमित्त लोक सोनेखरेदीबरोबरच वाहनेही घेतात. या मुहूर्तावर शहरातील नागरिकांनी वाहन आणि घरखरेदीला प्राधान्य दिले. यामुळे सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल जमा झाला आहे.
दसरा-दिवाळीपेक्षा गुढीपाडव्याला लोक मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी करतात. त्यामुळे परिवहन विभागाने सुटीच्या दिवशीही आरटीओ कार्यालये सुरू ठेवली. या वाहनांच्या नोंदणीतून सरकारला विक्रमी महसूल मिळाला. तीन दिवसांतील वाहनांच्या नोंदणीमुळे वाहन कर आणि नोंदणी शुल्काच्या रूपाने दोन कोटी 49 लाख 5003 रुपयांचा महसूल मुंबई पश्चिम आरटीओ विभागाकडून परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाला. 25, 27 आणि 28 मार्चला 380 वाहनांची नोंद करण्यात आली. सोमवारी सर्वाधिक 145 आणि गुढीपाडव्याला 101 वाहनांची नोंद झाली, असे ताडदेव आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
घर खरेदीलाही राज्यभरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यातील सात विभागांत दिवसभरात सहा हजार 27 घरांची नोंदणी झाली. त्यांच्याकडून 68 कोटी 66 लाखांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला.
|