मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून 11 लाख नावे गायब झाल्याचे पडसाद मंगळवारी (ता. 28) पालिकेच्या स्थायी समितीतही उमटले. मतदार यादीतील घोळाची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत.
मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी केलेल्या जाहिरातीच्या 21 लाख 62 हजार रुपयांच्या खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मांडण्यात आला होता. त्या वेळी भाजपचे दिलीप पटेल यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून मतदार यादीतील घोळाबाबत प्रशासनाला जाब विचारला. त्यावर सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी, मतदार यादीतून मराठी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला. अन्य सदस्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. या चर्चेची दखल घेऊन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मतदार यादीतील घोळाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
प्रत्येक प्रभागात मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबईतील 11 लाख नावे मतदार यादीतून गायब असल्याचा अंदाज आहे. या घोळाविरोधात शिवसेना न्यायालयात जाणार आहे.
|