मुंबई - तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी महिला-बालविकास विभागामार्फत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाचे निश्चितच प्रभावी कार्यान्वयन केले जाईल. तसेच महिला-बालविकास विभागामार्फत कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत तृतीयपंथीयांसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, की तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी महिला-बालविकास विभागामार्फत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत 2014 मध्येच निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळाचे कार्यान्वयन व्हावे, अशी तृतीयपंथीय संघटनांची मागणी आहे. राज्य सरकारमार्फत या मंडळाचे निश्चितच प्रभावी कार्यान्वयन केले जाईल; पण तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने विविध पाच योजना राबविण्याचे प्रस्तावित केले असून, त्याची अंमलबजावणी ही सामाजिक न्याय विभागामार्फत होणार आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठीच्या कल्याणकारी मंडळाचे कामकाज महिला-बालविकास विभागामार्फत होणार की सामाजिक न्याय विभागामार्फत होणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला होता; पण आज तृतीयपंथीय समाजाच्या विविध संघटनांसमवेत आमची अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.
तृतीयपंथीयांचा विषय हा महिला-बालविकास विभागानेच हाताळावा, अशी इच्छा या विविध संघटनांनी व्यक्त केली. त्यास अनुसरून तृतीयपंथीयांच्या विषयासाठी महिला-बालविकास विभागाअंतर्गत एक कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत केंद्राच्या विविध पाच योजना; तसेच राज्याच्या विविध योजनांचे सनियंत्रण करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंघल, तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी, अस्तित्व संघटनेचे प्रतिनिधी अथर्व यश आदी उपस्थित होते.
|