कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

नवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी समितीमध्ये ऊहापोह करण्यात आला. पालिकेतर्फे सुमारे ११ कोटी रुपये खर्ची घालूनही कामगारांना आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. तसेच, नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांमुळे अखेर हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.

महापालिकेतर्फे शहरातील मूषक नियंत्रण कार्यक्रमासाठी तीन वर्षांकरिता दोन्ही परिमंडळांकरिता सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. त्यावर चर्चा करताना नगरसेवकांनी कामगारांना मिळणाऱ्या सुविधेबाबत विविध प्रश्‍न उपस्थित केले. प्रशासनातर्फे एवढी रक्कम खर्ची केली जात असली, तरी कामगारांना दोन महिन्यांचे वेतन मिळत नाही. उंदरांना मारणारे विष हाताने बिळात टाकावे लागत असल्याने हातात मोजे व तोंडावर मास्कसारखी सुरक्षा साधने पुरवली जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनी मांडली. या कामगारांना उंदीर पकडण्यासाठी गटारात घाणीच्या साम्राज्यातही उतरावे लागते. त्या वेळेस त्यांच्या पायात बुटांऐवजी स्लीपर असते. या कामगारांना गणवेश नसतो.

वेतनातून भविष्यनिर्वाह निधी दिला जात नाही. रोगराई पसरवणाऱ्या उंदरांच्या मागावर असताना मेलेले उंदीर उचलताना कोणत्याही साधनांविना उचलावे लागतात. त्यामुळे हे कामगार अनेकदा आजारी असतात. शहराची स्वच्छता राखणाऱ्या कामगारांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डॉ. जयाजी नाथ यांनी केले. मूषक नियंत्रक कामगार आपले काम चोख बजावताना त्यांच्यावर अन्याय होत आहे. पालिका पिंजरे खरेदी करते ते कुठे जातात, असा हिशेबही नाथ यांनी मागितला. उंदरांसाठी औषध मारताना जर उंदीर मरत नसतील, तर त्याचा मनुष्यासाठी धोका निर्माण होईल. याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी केले.

चाळी व झोपडपट्टीत उंदीर वाढले आहेत. उंदीर एवढे मोठे झाले आहेत की, सर्वसामान्यांनाही मारता येत नाहीत. त्यामुळे अनेक लहान मूलांना मूषकदंश झाला आहे, अशी तक्रार नगरसेवक नवीन गवते यांनी केली.

मूषक नियंत्रक कामगारांना ऑगस्टपर्यंत पगार दिला आहे; तसेच त्यांना भविष्यनिर्वाह निधीसुद्धा दिला जातो. उंदीर पकडण्यासाठी पिंजरे पावसाळ्यात वापरले जातात. आपले कामगार रात्री जास्त काम करतात. औषधांची लॅबमध्ये तपासणी करण्यात येत आहे. नोंदणीकृत संस्थेकडूनच औषध घेतले जाते.

- दयानंद कटके, आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com