लॉकडाऊनमुळे मिरचीचे देठ काढणे बंद; धर्माबाद मिरचीचे कोठार म्हणून प्रसिध्द

file photo
file photo

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुरुवारी (ता. २५) पासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी धर्माबादेतही सुरु असून लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. यात मिरचीचे देठ काढणाऱ्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे मिरचीचे देठ काढणे बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या दीडशे- दोनशे महिला मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने खाजगी फायनॉन्स कंपनीचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न कर्जदार महिलांपुढे उभा आहे.

शहरातील रेल्वेगेट नंबर एकच्या बाजूला असलेले रुपम संपतराव झंवर यांचा मिरचीचे देठ काढण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये गेल्या दहा बारा वर्षांपासून करतात. या ठिकाणी मिरचीचे देठ काढण्यासाठी शहरातील रत्नाळी, इंदिरानगर, रसिकनगर, शंकरगंज, मौलालीनगर, रुक्मिणीनगर, फुलेनगर येथील दीडशे, दोनशेच्या जवळपास गोरगरीब महिला मजूर दररोज मिरचीचे देठ काढण्यासाठी येतात. व त्या महिला प्रतिकिलो आठ ते दहा रुपये प्रमाणे मिरचीचे देठ काढतात. यामुळे दररोज त्यांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळते. या मजुरीतूनच महिला मजूर आपल्या संसाराचा गाडा सुखदुःख सहन करीत चालवत असतात.

सध्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे याचा फटका मिरचीचे देठ काढणाऱ्या व्यवसायालाही बसला आहे. मिरचीचे देठ काढण्याचा व्यवसाय बंद आहे. या लॉकडाऊनमुळे मिरचीचे देठ काढणाऱ्या महिला मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक महिला फायनॉन्स कंपनीकडून कर्ज घेतले असून ते हप्तेवारीने परतफेड करतात. मात्र लॉकडाउनमुळे मिरचीचे देठ काढणे बंद असल्याने कामही बंद झाले आहे. त्यामुळे फायनॉन्स कंपनीचे हप्ते कसे फेडायचे, अशी चिंता मजूर महिलांना सतावत आहे. तिखट मिरचीचे देठ काढतांना डोळ्यात कधी पाणी आले नाही मात्र लॉकडाऊनने डोळ्यात पाणी आणल्याचे अनेक महिला मजूर सांगत आहेत. गोरगरीब मजूर महिलांच्या उदरनिर्वाहसाठी हाताला काम असणे आवश्यक असून त्या कष्टाच्या मजुरीतूनच कुटुंबाचे पोट भरण्याचे सुखही मिळते. तरी या महिला मजुरांना प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महिला मजूर वर्गातून होत आहे.

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका 

उन्हाळ्याची चाहूल लागली की गृहिणी मिरची, चटणी, मसाले बनविण्यात व्यस्त असतात. धर्माबादच्या मिरचीचा ठसका अटकेपार आहे. मात्र गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही ऐन सीझनमध्ये लॉकडाउन झाल्याने येथील मिरची व्यवसायाला कोट्यवधींचा आर्थिक झटका बसला आहे. तसेच मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका बसल्याने गृहणीचे बजेट कोलमडले आहे.

मिरचीचे देठ काढण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत असून कष्टाच्या मजुरीतून माझं कुटुंब चालत आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. शेतातील कामे करता येत नाहीत. मिरची व्यवसाय बंद असल्याने काम नाही. हप्ते भरायचे तरी कसे?
- राणी जिब्बेनवाड, महिला मजूर.
रोजंदारीवर आमचं कुटुंब आहे. हाताला काम नाही. जीवन जगावे तरी कसे? तिखट मिरचीचे देठ काढतांना कधी डोळ्यात पाणी आले नाही. मात्र लॉकडाऊनने डोळ्यात पाणी येत आहे. सरकार मायबाप हो, आमच्या हाताला काम द्या.
- शोभा वाघमारे, महिला मजूर.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com