साताऱ्यात २०४ इमारती धोकादायक

सातारा - शहरात अशा जीर्ण इमारतींमुळे परिसरातील रहिवासी व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका पोचू शकतो.
सातारा - शहरात अशा जीर्ण इमारतींमुळे परिसरातील रहिवासी व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका पोचू शकतो.

सातारा - राजपथावरील धोकादायक इमारतीने तिघांचा बळी घेतला होता. ही इमारत उतरविण्यासाठी पालिकेला आलेला सुमारे ७१ हजार रुपये खर्च अडीच वर्षे उलटूनही पालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. मात्र, या जागेवर मालक मात्र उत्पन्न कमवत आहे. दरम्यान, सातारा शहरात २०४ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या असल्या, तरी बहुतांश इमारती वादाच्या भोवऱ्यात आहेत.

पावसाळा आला, की पालिका प्रशासनाला धोकादायक इमारतींची आठवण होते. मग या सर्वांना नोटिसा काढल्या जातात. त्यानंतर पालिकेची जबाबदारी संपते, असा अर्थ काढला जातो. सप्टेंबर २०१४ मधील दुर्घटनेच्या अनुषंगाने राजपथावर, जनता बॅंकेशेजारी, लांजेकर बिल्डिंगबाबत हाच अनुभव आला. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. दगड- मातीच्या ढिगाऱ्याखाली तिघे गाडले गेले. एक महिलाही गंभीर जखमी झाली होती. या भीषण दुर्घटनेपूर्वी पालिकेने संबंधित इमारतीवर धोकादायक इमारत म्हणून खबरदारीची नोटीस चिटकवली होती. त्याचा पुढे पाठपुरावा झालाच नाही आणि तिघांना हकनाक जीव गमवावे लागले. दुर्घटनेनंतर निर्माण झालेला मातीचा ढिगारा हटविण्यासाठी पालिकेचा सुमारे ७१ हजार रुपये खर्च आला. गेल्या अडीच वर्षांत हा खर्चही संबंधित मालकाने पालिकेत भरला नसल्याची माहिती पुढे आली आहे. पडलेल्या इमारतीच्या जागेवर सध्या गृहोपयोगी साहित्याचे प्रदर्शन व विक्रीचा मोठा स्टॉल लागला आहे. या स्टॉलला पालिकेची परवानगी नाही. जागा मालकाच्या नावावर पालिकेची थकबाकी आहे. ही थकबाकी व्याजासह वसूल होत नाही, तोवर त्या जागेवर मालकाला कोणीतेही बांधकाम, अगर विकास करता येणार नाही. पालिकेचे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

शहरात आजच्या घडीला २०४ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातील काही इमारतींमध्ये काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहात आहेत. या जुन्या व धोकादायक इमारती दाट लोकवस्तीत, गजबजलेल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आर्थिक, तसेच जीवितहानीची भीती आहे. २०४ पैकी बहुतांश इमारती मालक- भाडेकरू यांच्यातील वादाच्या भोवऱ्यात आहेत. मालक इमारतीची दुरुस्ती करत नाहीत. काही इमारती उतरवून घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हक्कावरून घरमालक व भाडेकरू यांच्यावर न्यायालयात खटले दाखल आहेत. जागा सोडल्यास हक्क संपुष्टात येणार असल्याने भाडेकरू धोकादायक स्थितीतही जागा खाली करत नाहीत. या दोघांच्या वादात भविष्यात धोकादायक इमारतीबाबत दुर्घटना घडून त्यातून कोणला इजा झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

इमारती जीर्ण का होतात? 
भिंतींना पडलेल्या भेगा मोठ्या होत जाणे, बीम वाकणे, वाळवी व पाण्यामुळे इमारतीचे लाकूड खराब होणे आदींकडे दुर्लक्ष धोकादायक ठरते. विविध कारणांमुळे निर्माण होणारा ओलावा इमारतीसाठी अत्यंत धोकादायक असतो. इमारतीतील स्वच्छतागृहालगतच्या भिंतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा निर्माण होतो. सांडपाण्याच्या गळक्‍या पाइपमुळेही ओलावा निर्माण होतो. इमारतीच्या खोल्यांत चुकीच्या ठिकाणी जड वस्तू ठेवल्यास इमारतीचा समतोल बिघडतो. इमारतीच्या मूळ संरचनेत आमूलाग्र बदल करून विस्तार केल्याने पायावर अनेक दिशेतून दबाव पडून समतोल बिघडू शकतो, तेच धोकादायक ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com