जल अभियंत्यासह तिघांचे पगार रोखले

जल अभियंत्यासह तिघांचे पगार रोखले

कोल्हापूर - दुधाळी एसटीपीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला वेळेत सादर न केल्याचा ठपका ठेवून, प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यासह अन्य तिघांचे पगार आयुक्तांनी रोखले आहेत. अन्य अधिकाऱ्यांत टेंडर क्‍लार्क प्रशांत पंडत, शाखा अभियंता आर. के. पाटील, लिपिक दत्तप्रसाद माजगावकर यांचा समावेश आहे.

चौघांनाही जूनच्या पगारापासून वंचित राहावे लागणार आहे. 
रंकाळा, तसेच पंचगंगा प्रदूषण रोखण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) पाचव्या व सहाव्या टप्प्यातील उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर झाले नाही. ही जबाबदारी कुलकर्णी यांच्यासह अन्य तिघांवर होती असे आयुक्तांचे म्हणणे आहे. शासनाकडून विविध विकासकामांसाठी निधी येतो, तो खर्ची पडल्यानंतर विशिष्ट विवरणपत्रात अहवाल सादर करावा लागतो. वेळेत निधी खर्च न झाल्यास तो परत जाण्याची टांगली तलवार असते. दुधाळी एसटीपीसाठी २६ कोटींचा निधी मिळाला. चार वर्षांपासून काम सुरू होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा कोल्हापूर दौरा निश्‍चित झाल्यानंतर एसटीपी कार्यान्वित झाला. एसटीपी सुरू होण्यास विलंब का झाला, प्रदूषण रोखण्याच्या कामी अपयशी ठरल्याने आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कदम यांनी दिले.

हाताखालची यंत्रणा कमी पडते आणि त्याचा परिणाम आयुक्तांवर होत असल्याने आयुक्तांनी कठोर भूमिका घेत पगार रोखले आहेत. 

तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी कारवाई केली होती. एखाद्या प्रकल्पाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे ही क्‍लिष्ट प्रक्रिया आहे. ज्यांचे पगार रोखले आहेत, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

उपयोगिता प्रमाणपत्रासाठी संबंधित ठेकेदार, कन्सल्टन्सी यांचीही मदत घ्यावी लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय ही यंत्रणा हालत नाही. थेट पाइपलाइन, दैनंदिन पाणीपुरवठा, पाइपलाइनची गळती, ड्रेनेजच्या अडचणी. एसटीपी, अमृत योजनेतून सुरू असलेली कामे असे व्याप पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाच्या मागे आहेत. एकेका प्रकल्पासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी द्यावे लागतील अशी स्थिती आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे काम वेळेवर होत नाही. शासनाला कारणे सांगून चालत नाही. अधिकाऱ्यांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही आणि शेवटी पगार रोखण्याच्या कारवाईला सामारे जावे लागते.

‘दुधाळी’चे श्रेय गायकवाड यांनाच
उपअभियंता आर. बी. गायकवाड यांनी दुधाळी एसटीपीला वीज कनेक्‍शन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केला. एसटीपीचे काम पूर्ण झाले; पण वीज कनेक्‍शन नसल्याने अडचण निर्माण झाली होती. महावितरणशी सातत्याने संपर्कात राहून वीज कनेक्‍शन घेण्याचे काम गायकवाड यांनी केले. गेल्या महिन्यापासून ते जवळपास मुक्कामालाच महावितरणकडे होते अशी स्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com