जिल्ह्यात या वर्षी होणार आठ लाख वृक्ष लागवड 

जिल्ह्यात या वर्षी होणार आठ लाख वृक्ष लागवड 

कोल्हापूर - जिल्ह्यात या वर्षी पावसाळ्यात आठ लाख सतरा हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी, सात लाख ६६ हजार खड्डे खणले आहेत. तसेच, ३५ हजार हेक्‍टर जागा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.  

श्री शुक्‍ला म्हणाले, ‘‘२०१६ मध्ये जिल्ह्यात सहा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. यामध्ये ७ लाख ८२ हजार वृक्ष लागवड झाली आहे. दरम्यान, या वर्षीच्या पावसाळ्यात ८ लाख १७ हजार रोपे लावली जाणार आहेत. या रोपांची वाढ दोन वर्षापासून झालेली असेल. अशीच रोपे निवडली आहेत. जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने वृक्ष लागवड केली जाणार आहे. यामध्ये या वर्षी आठ लाख १७ हजार, २०१८ ला १७ लाख ३० हजार व २०१९ ला ३६ लाख ४० हजार वृक्ष लागवड केली जाईल. यासाठी वन विभाग आणि शासकीय सर्व विभागासाठी वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात वृक्ष लागवड सक्षमपणे केली जाईल. रोपवाटिका वन विभाग, सामाजिक वनीकरणकडून याची तयारी केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावांत ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे यंदाची वृक्ष लागवड प्रभावीपणे पार पडणार आहे. 

वन विभागाशी संपर्क साधा
ज्यांना वृक्षदान व वृक्ष लागवड करायची आहे, त्यांनी कसबा बावडा येथील वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. शुक्‍ला यांनी केले आहे. 

फळझाडांना प्राधान्य 
या वर्षीच्या वृक्ष लागवडीत फळझाडांना प्राधान्य दिले आहे. फळझाडांमुळे फुले आणि फळे येतात. याचा पक्षी, प्राण्यांसह माणसांनाही उपयोग होता. फळझाडांच्या वाढीमुळे निसर्गचक्र सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. या साठी या वर्षी फळझाडांना प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com