कोल्हापूर - सहा महिन्यात ज्यांनी आपल्या जातीचे दाखले दिले नाहीत, अशा राज्यातील 450 नगरसेवकांवर कायद्यानूसार कारवाई होईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या सहारिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
सहारिया म्हणाले, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने जात पडताळणीचे दाखले आधीच घेवून ठेवले पाहिजे. सहा महिन्यात जात पडताळणीचे दाखले दिले पाहिजेत. हे दाखले कायद्यानुसार किंवा शासन निर्णयानुसार वेळेत दिले पाहिजेत. राज्यात ज्यांनी वेळेत दाखले दिलेले नाहीत. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल.
दरम्यान, ही बाब न्यायालयीन प्रक्रियेची आहे. न्यायालयातच याचा निकाल होवू शकतो, असेही सहारिया यांनी नमूद केले. यावेळी, अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. राजेश देशमुख, निवडणूक निरीक्षक अजित पवार, नंदकुमार काटकर उपस्थित होते.