शेतकरी 1 जूनला पुन्हा रस्त्यावर : डॉ. अजित नवले

शेतकरी 1 जूनला पुन्हा रस्त्यावर : डॉ. अजित नवले

सांगली : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपानंतर लॉंग मार्चवेळी राज्य सरकारने दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याबाबत प्रभावी पावले उचललेली नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी 1 जूनला राज्यभर पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. सर्व शासकीय कार्यालयांना शेतकरी घेराओ घालतील, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ऐतिहासिक शेतकरी संपाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने या दिवशी समविचारी शेतकरी संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,''नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर सरकारने आश्‍वासने दिली होती.

मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन मिळाले होते. दोन महिने उलटले, तरी भरीव अंमलबजावणी दिसत नाही. काही मागण्यांबाबत हलचाली असल्या तरी हमीभाव, दूध दर, पेन्शन, रेशन आदी प्रश्‍नांवर सकारात्मकता दिसत नाही.'' 

ते म्हणाले,''सरकारने पाठीत खंजीर खपसून विश्वासघात केला. त्याचा निषेध करूच, शिवाय देशातील 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याचे निवेदन सरकारला देऊ.'' 

उमेश देशमुख, सुभाष निकम, आप्पासाहेब पाटील, दिगंबर कांबळे, डॉ. सुदर्शन घेरडे, गुलाबराव मुलाणी, गवस शिरोडकर उपस्थित होते. 

दूध रोखावे लागेल 
डॉ. अजित नवले यांनी शहराकडे जाणारे दूध रोखण्याचा इशारा दिला. ते म्हणाले,''दूध दरवाढ द्यायला सरकार तयार नाही. शेतकऱ्यांना प्रतिलिटर दहा रुपयांचा तोटा होतोय. राज्यभरात त्याबाबत ग्रामसभेत ठराव केले जाणार आहेत. त्यानंतर शासकीय कार्यालये, भाजपचे पदाधिकाऱ्यांना मोफत दूध देऊ. त्यातूनही सरकार शहाणे झाले नाही तर ग्रामीण भागातून शहरांकडे जाणारे दूध रोखावे लागेल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com