अल्फोन्सा स्कूल प्रशासन पालकांकडून धारेवर

पाडळी खुर्द (ता. करवीर) - येथील अल्फोन्सा स्कूल प्रशासनाशी चर्चा करताना पालक.
पाडळी खुर्द (ता. करवीर) - येथील अल्फोन्सा स्कूल प्रशासनाशी चर्चा करताना पालक.

कोल्हापूर - मुलांना बेदम मारहाणीस विरोध, शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, पाठ्यपुस्तकांसह मुलांना कला, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागातही सहभागी करून घेतले पाहिजे, या मागण्यांसाठी आज पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील अल्फोन्सा स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी निदर्शने केली. पालक समजुतीने भेटायला आले असताना प्रशासनाने केवळ दोघे भेटतील, अशी आडमुठी भूमिका घेऊन पोलिसांकडून पालकांना प्रवेशद्वाराजवळच अडविण्याचा प्रयत्न झाल्याने पालक संतप्त झाले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. 

पालकांनी अल्फोन्सा स्कूलबाबत तक्रारींचा पाढाच वाचला. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली जाते. शिक्षण घेत असताना त्यांना योग्यरीत्या समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही. विद्यार्थ्यांच्या बुटाची नाडी जरी सुटली तरीही अमानुषपणे मारहाण केली जाते, हे चुकीचे आहे. शाळेत 

स्वच्छतागृहाची आवश्‍यकता आहे. तसेच इतिहास विषय शिकविताना त्यांची उदाहरणे किंवा गोष्टी रुपात सांगितले पाहिजे, मात्र येथील शिक्षक तो धडा वाचून दाखवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कितपत समजतो, हा प्रश्‍न आहे. अधूनमधून मुलांच्या प्रगतीबाबत किंवा त्यांच्या अभ्यासाबाबत एखाद्या शिक्षकाला विचारल्यास थेट ते प्रिन्सिपॉलला विचारा म्हणून सांगतात. आदी बाबींवरून पालक आक्रमक झाले होते. 

पूर्वी शाळेच्या शिक्षणाचा दर्जा चांगला होता. दोन वर्षांपासून तो दर्जा कमी झाला आहे. हेच निवेदन देण्यासाठी शाळेत आलो होतो; पण माझी बदली होणार आहे. दुसरे प्रिन्सिपॉल आल्यानंतर त्यांना हे निवेदन द्या, असे सांगून निवेदन घेण्याचे टाळले. त्यामुळे पालक संतप्त झाल्याने गोंधळ उडाला. 

पालक आहोत, आम्ही गुंड नाही
मुलांची शालेय प्रगती कशी आहे. शाळेतून अपेक्षा काय आहेत, मुला-मुलींवर खोटे आणि चुकीचे आरोप करून प्रिन्सिपॉलांकडून त्रास दिला जात आहे, अशा शेकडो लेखी तक्रारी स्कूलला दिल्या आहेत; पण त्यावर कोणतीही कारवाई किंवा चौकशी झाली नाही. आताही आम्ही चर्चा करायला आलो असताना आम्ही गुंड असल्यासारखे पोलिस तैनात मागविली आहे. ही शाळेची वृत्ती चुकीची असल्याचे उपस्थितांनी सांगितले. 

प्रिन्सिपॉलांकडून मारहाण होते  
नवीन आलेल्या प्रिन्सिपॉलांकडून मुलांना नेहमीच मारहाण होते. मुलांना खोलीत डांबून ठेवीन, अशी भीती घालतात. त्यामुळे मुलांचे शिक्षणाकडील लक्ष विचलित होते. केरळमधील शिक्षकांना मराठी येत नाही. ते मुलांना समजतेय की नाही, याचा विचार करत नाहीत. त्यामुळे मुले अभ्यासात अप्रगत राहत आहेत. मुलांना मारू नये, शिक्षणाचा दर्जा सुधारावा, शिक्षकांनीही मुलांना समजावून सांगितले पाहिजे, प्रिन्सिपॉल यांनी मुलांशी सलोख्याने वागावे, याचा प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी मिलिंद निकम, अस्लम किल्लेदार, उमेश साळोखे यांच्यासह सर्व पालकांनी केली. 

पालकांच्या तक्रारींचा विचार केला जाईल
पालकांनी तक्रारी दिलेल्या आहेत. त्याबाबत निश्‍चित विचार केला जाईल. पालकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेण्यासाठी ११ मार्चला विशेष पालक बैठक घेतली जाईल. ज्यांच्याबद्दल तक्रार आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे संस्थेच्या प्रशासनाच्या वतीने फादर मॅथ्यू यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com