दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव आज आयुक्तांना देणार

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव आज आयुक्तांना देणार

कोल्हापूर - उन्हाच्या तीव्र झळा, नदीच्या पाणीपातळीत होत राहणारी लक्षणीय घट, यामुळे कोल्हापूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करणेच योग्य असल्याने आणि गतवर्षी हा प्रयोग यशस्वी ठरल्याने पाणीपुरवठा विभागाने दिलेला  दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आता महापालिका उपायुक्तांकडे गेला आहे. 

सोमवारी (ता.६) तो आयुक्तांकडे दिला जाणार आहे. हा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे. 

गतवर्षी कावळा नाका टाकीवर अवलंबून असणाऱ्या ई वॉर्डातील बहुतांशी भागाने, या योजनेला मान्यता दिली होती. त्यामुळे यंदाही हा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

गेल्या आठवड्यापासून नदीच्या पाण्याच्या पातळीत सतत घट होत आहे. धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्याचे काम पाटबंधारे विभाग करतो. पाटबंधारे विभागाकडून दर १८ दिवसांनी नदीत पाणी सोडले जाते; पण आता उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठावरील गावेही मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करतात त्यामुळे नदीतील पाणी लवकर संपत आहे. कोल्हापूर शहराला रोज १३० एमएलडी पाण्याची गरज असते. त्यासाठी बालिंगा आणि शिंगणापूर बंधाऱ्याजवळून पाणी उपसा करण्यात येतो. येथे जर अपेक्षित पाण्याची पातळी मिळाली नाही, तर मात्र शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळित होते. गेला आठवडाभर याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. 

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ई वॉर्डातील बहुतांशी नगरसेवकांनी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मुद्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. त्यावर काही नगरसेवकांनी विरोध केला, तर काही नगरसेवकांनी ई वॉर्डातच हा प्रयोग करावा, अशी मते मांडली आहेत; परंतु प्रत्यक्षात संपूर्ण शहरातही प्रयोग केला. आणखी मोठ्या प्रमाणात फायदा शहाराला होणार आहे. विजेची आणि पाण्याची बचत तर होणारच आहे. शिवाय महापालिकेचे वीज बिलापोटी सुमारे ५० लाख रुपये वाचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रस्तावावर विचार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तांत्रिक बिघाड हेच कारण : कुलकर्णी
शहरासाठी दररोज १३० एमएलडी पाण्याचा पुरवठा करावा लागतो. यासाठी पाणी उपसा करणे, शुद्धीकरण करणे, शहरातील पाण्याच्या टाक्‍या भरणे ही अखंड प्रक्रिया करावी लागते. यामध्ये वीजपुरवठा खंडित होणे, विद्युत पंपात बिघाड होणे, पाइपलाइन फुटणे अशा तांत्रिक बाबी घडल्या तर पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळित व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे तांत्रिक बिघाड हेच यामागचे कारण आहे, असे सुरेश कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com