जो स्वतःसाठी खड्डा खणतो त्यात त्याचाच कपाळमोक्ष होतो, अशी एक म्हण मराठीभाषेमध्ये आहे. तिचा संदर्भ याठिकाणी देण्याचमागणी भूमिका म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आज (मंगळवारी) झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची पार्श्वभूमी.
सोलापूर जिल्ह्यावर एकेकाळी मोहिते - पाटील घराण्याची जबरदस्त पकड होती, एकचालुकानुवर्ती सत्ता होती. खासदारकी, मंत्रीपद, जिल्हा परिषदेचे अघ्यक्षपद, पक्षातील प्रमुखपद अशी अनेक मोठी अधिकारपदे त्यांच्या घरात होती. सहाजिकच अशा घट्ट पकड असलेल्या सत्तास्थानातून त्यांच्याकडून अनेक छोट्यामोठ्या प्रसंगात जिल्ह्यतील दुसऱ्या फळीतील नेत्यांना दुखावले जाऊ लागले. किंबहुना तशी तक्रार हे दुसऱ्या फळीतील नेते खासगीत करू लागले. या तक्रारींच्या असंतोषाचा वणवा दिवसेंदिवस वाढतच होता. यावणव्याची झळ संजय शिंदे, प्रशांत परिचारक, विजयराज डोंगरे, मंगळवेढ्याचे आवताडे, शहा कुटुंबीय यांच्यासह अनेक प्रस्थापित घराण्यांना बसत होती. यातून काही घराण्यांनी मोहिते - पाटलांपासून फारकत घेऊन आपला स्वतंत्र चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू केला तो काळा साधारणतः 1997 -98 च्या युतीसरकारच्या काळातील होता.
सीना - माढा बोगद्याच्या पाण्यातून आपल्या मतदारसंघाचा फायदा होतोय अशी सबब सांगून माढ्याच्या शिंदे घराण्याने तेव्हा सर्वात प्रथम मोहिते - पाटलांपासून आपल्याला अलग करत युती सरकारला पाठींबा दिला. त्यांची री ओढत तेव्हा राज्यातील अपक्षांचे नेते असलेल्या बार्शीच्या दिलीप सोपलांनीही आपला स्वतंत्रबाणा दाखवून देत मोहिते - पाटलांपासून अंतर राखत न्याय व विधीखात्याची जबाबदारी शिरावर घेतली.
असे जरी असले तरी जिल्ह्यतील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, गणपतराव देशमुख, राजन पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मोहिते - पाटलांशी एकनिष्ठ होते. असे असले तरी त्यांच्यात काही कुरबुरी सुरूच होत्या. काळ जसजसा पुढे जात होता तसतशी जिल्ह्यातील प्रस्थापीत राजकारण्यांची दुसरी पातीही राजकारणात स्वतःची जागा निर्माण करण्यात धडपडत होती.
त्यातच 2009 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटलांनी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणला. परंतु त्यात त्यांना जोरदार पराभव पत्करावा लागला. यापराभावाला परिचारक घराणेच जबाबदार असा आरोप करून मोहिते - पाटलांनी परिचारकांशी उघडपणे सावतासुभा सुरू केला. यातून त्यांनी पंढरपुरात परिचारक विरोधात आमदार भारत भालके यांना जवळ केले. खरेतर मोहिते- पाटलांचही ती राजकीय रणनितीची तशी असायची. म्हणजे अक्कलकोटमध्ये सिद्धाराम म्हेत्रेंच्या विरोधात भाजपाच्या सिद्रामाप्पांना जवळ करयाचे, करमाळ्यात बागलांच्या विरोधात नारायण पाटलांना बळ द्यायचे, मंगळवेढ्यात प्रा. लक्ष्मण ढोबळेंच्या विरोधात कधी अवताडे तर कधी शहा तर कधी मारवाडीवकील गटास आपलसं करायचे. यामुळे प्रस्थापित नेते मोहिते - पाटलांच्या या राजकारणाला कंटाळले होते.
त्यात्रासातून संजय शिंदे आणि प्रशांत परिचारक ही जोडगोळी सर्वात प्रथम मोहिते - पाटलांच्या विरोधात उघडपणे एकत्र आली, या जोडगोळीने मिळेल त्या प्रसंगात मोहिते - पाटलांच्या विरोधात भूमिका घेतली. जी मोहिते - पटालांची भूमिका नेमकी त्याविरूद्ध या दोघांची भूमिका असायची. यातून दूधसंघ सुटला नाही की जिल्हा परिषदेमधील फोटोंचे राजकारणही सुटले नाही. ही शह - काटशहाची मालिका दिवसेंदिवस वाढत गेली. मोहिते - पाटलांना विरोध या एका सूत्राने शिंदे - परिचारक या जोडगोळीस जिल्ह्याभरातील अनेक छोट्या - मोठ्या नेत्यांनी कधी गुप्तपणे तर कधी खुलेपणाने पाठींबा दिला यातूनच मोहिते - पाटालंच्या सोलापूर जिल्ह्यावरील एकछत्री अंमलास हादरे बसण्यास प्रारंभ झाला.
याचा कळस झाला तो आज (मंगळवारी) झालेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीने. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल 23 सदस्य जिल्हा परिषदेसाठी निवडणून आले आहेत. शिदे - परिचारक जोडगोळीला मानणारे तुलनेने कमी सदस्य असतानाही आज शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. विशेष म्हणजे याकामी ऐकेकाळचे मोहिते - पाटील समर्थक किंवा त्यांच्या गटाचे असेलेल्या नेत्यांनीसुद्धा साथ दिली. याला कारण मोहिते - पाटलांची राजकीय कुटनीती. त्यामुळे सुरूवातीला व्यक्त केलेली मराठी भाषेतील म्हण खऱ्या अर्थाने सार्थ ठरते असेच दिसून येते.
|