सोलापूर - धनगर समाजाचे दुख: समजून घ्यायला कोणी येईल, आमचे प्रश्न कोणीतरी येऊन सोडवेल या भोळ्या आशेत आता राहू नये. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतील. ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता मिळवा. जगाशी स्पर्धा करण्याठी सज्ज व्हा, असे आवाहन पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी केले.
सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते आज संमेलनाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्याध्यक्ष खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.
सोनवणी म्हणाले, 'धनगर समाजाला प्रगती साधायची असेल तर जगाच्या स्पर्धेत आपला इतिहास आणि संस्कृती मांडावी लागेल. धनगर समाजाने आजपर्यंत इतर समाजाच्या बाबतीत मोठ्या भावाची भूमिका स्वीकारून इतर समाजाला विकासाची संधी दिली. प्रगती झाल्यानंतर मात्र लहान भाऊ मोठ्या भावाला विसरला आहे.''
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. धनगर समाजाबद्दल नुसती सहानुभूती नको, तर प्रत्यक्षात आरक्षण मिळायला हवे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. धनगर समाजाची मागणी निश्चित मार्गी लागेल.
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री
|