करवीर दक्षिण, राधानगरीपर्यंत बीएसएनएल ठप्प

करवीर दक्षिण, राधानगरीपर्यंत बीएसएनएल ठप्प

थेट पाईपलाईनचे कारण - आठ महिन्यांपासून होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष

कोल्हापूर - थेट पाईपलाईनची खोदाई सुरू आहे, यामुळे लाईन कट होते. यापेक्षा थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होईपर्यंत तुमचे फोन, ब्रॉडबॅंड व इंटरनेट बंदच ठेवा, असा सल्ला खुद बीएसएनलचे वरिष्ठ अधिकारी देत आहेत. काळम्मावाडी, राधानगरी ते करवीर तालुक्‍यामधील गावांमधून जाणाऱ्या थेट पाईपलाईनसाठी खुदाई केलेल्या गावांमध्ये बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे, बीएसनएनएलवर विश्‍वास असणाऱ्या ग्राहकांकडून इतर कंपन्यांचे पर्याय शोधले जात आहेत. 

करवीर तालुक्‍यातील वाशी, हळदी, भोगावतीपासून राधानगरीपर्यंत थेट पाईपलाईनचे काम सुरू आहे. हे काम करत असताना बीएसएनएलची लाईन कट होत असल्याचे कारण वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. या कामामुळे बीएसएनएलची सेवा खंडित झाली तर ती पूर्ववत करण्याची जबाबदारी बीएसएनएलच्या ज्या-त्या कार्यालयाची आहे. पण, हे अधिकारी सेवा विस्कळीतच व्हावी अशी वाट पाहत असल्यासारखे वागत आहेत. लाईन कट झाली असेल तर तत्काळ दुरुस्त करावी,अशी मागणी ग्राहकांकडून केली जात असताना वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.  

हळदी, भोगावती परिसरात अनेक ग्राहकांनी बीएसएनएलचा बिझनेस प्लॅन घेतला आहे. नेट कॅफे, फायनान्स सर्व्हिस, बॅंक, स्पर्धा परिक्षा केंद्र, विद्यार्थी, या प्लॅननुसार महिन्याला १३०० ते १५०० रुपये बिल भरतात. मात्र त्यांना योग्य सेवाच दिली जात नाही. महिन्यातील १५ दिवस कमी गतीने इंटरनेट सेवा दिली जाते. इंटरनेटच्या या स्पीडमध्ये कोणतीही वेबसाईट उघडली जात नाही. बीएसएनएलच्या लाईनला कोणता प्रॉब्लेम आला आहे हे न पाहता, ग्राहकांना जमेल तशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यापलिकडे अधिकाऱ्यांकडून कोणतेही कष्टही घेतले जात नाही. 

या लाईनवरील खोदकाम सुरू असताना आठ ते नऊ महिन्यापूर्वी एक सुपरवायझर नियुक्त केला होता. जिथे-जिथे खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी तो अधिकारी कायमस्वरूपी काम करत होता. त्यामुळे कोणतीही समस्या आली नाही. आता पूर्वीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होवून दुसरे अधिकारी नियुक्त झाले आहेत. त्यांनी सुपरवायझर नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे.

सेवाच होईल बंद...
खासगी कंपन्यांकडून मोफत सिमकार्ड, कमी पैशात नेट पॅकच्या योजना दिल्या आहेत. अशावेळेला बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडील ग्राहक किमान आपल्याकडे राहतील याची काळजी घेतली पाहिजे. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देऊन किंवा तुमचे कनेक्‍शन बंद करा असे सल्ले देण्याचे काम केले जात असल्याने बीएसएनएलची करवीर दक्षिण भागातील गावांपासून राधानगरीपर्यंतची सेवा कायम बंद होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे. 

बिलही कमी नाही
बीएसएनएलची सेवा खंडित असताना त्याचे बिल मात्र ठरलेल्या तारखेला आणि वेळेलाच घेतले जाते. खंडित सेवेचे बिल कमी करून मागितले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com