शेतकऱ्यांसाठी माल तारण योजना - सदाभाऊ खोत

शेतकऱ्यांसाठी माल तारण योजना - सदाभाऊ खोत

सांगली - तरुणांनी शेतीकडे वळावे ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी आयात-निर्यातीचे प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी माल तारण योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत दिली.

राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महाकृषी महोत्सव कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातून या प्रदर्शनाचा प्रारंभ  केला जाणार असून मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात इस्लामपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. त्याच्या तयारीबाबत आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार बैठकीत बोलत होते.

या वेळी अपर जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र साबळे, प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, जिल्हा कृषी विकास अधिकारी रघुनाथ भोसले आदी उपस्थित होते.

मंत्री खोत म्हणाले,‘‘नवीन पिढीने शेतीत यावे यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शेतमालाचा हमी भाव कमी झाल्यास सरकारने खरेदी केंद्र सुरू केली आहेत. 

ज्वारी, गहू, कडधान्याचे हमीभाव निश्‍चित केले आहेत. त्याच्यापेक्षा दर कमी केल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई  केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालासाठी माल तारण योजना राबवणार आहे. यामध्ये भाव खाली गेल्यास शेतकऱ्यांनी वेअर हाऊसमध्ये माल द्यावा त्याच्या ७५ टक्के उचल त्यांना देण्यात येईल.’’ 

आधुनिक शेतीचे ज्ञान प्रदर्शनातून मिळणार
मंत्री श्री. खोत म्हणाले,‘‘शेतकऱ्यांना शेतीबद्दल अत्याधुनिक ज्ञान मिळावे, यासाठी राज्य सरकारमार्फत प्रदर्शन भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सध्या शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाची माहिती आणि त्याचे मार्गदर्शन 

अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे याची माहिती या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. राज्यातील विविध देशी बियाणांची माहिती, शेतीचे सखोल ज्ञान, देशी बियाणांचे वाण, नवीन बियाणांची माहिती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसचे आंबा महोत्सव असणार आहे. यामध्ये कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोफत जागा पणन विभागाच्यामार्फत दिली जाणार आहे.’’

तासगावला जागतिक दर्जाचे बेदाणा केंद्र
राज्यात प्रत्येक विभागात फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला गोडावूनसाठी जागा देणार आहे. या कंपन्या सक्षम  करणार आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात केंद्र उभारण्यात येणार आहे. बेदाण्याला तासगावमधून जागतिक मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तासगावला जागतिक दर्जाचे बेदाणा विक्री केंद्र  उभारण्यात येणार आहे, असे मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com