सोलापूर : राज्यातील 14 जिल्ह्यांत स्त्रीजन्माचा टक्का वाढला आहे. केंद्र पुरस्कृत 'बेटी बचाओ-बेटी बढाओ' या योजनेमुळे हा बदल झाला असून या योजनेचा आता राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जालना व हिंगोली या दोन जिल्ह्यांत मात्र प्रमाण घटले आहे.
जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-2017 या तीन वर्षांसाठी राबवायची होती. पहिल्या टप्प्यात 10 आणि नंतरच्या टप्प्यांत सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेची खात्री देणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा समावेश होता, आता केंद्र शासनाने या योजनेत महाराष्ट्रातील आणखीन 19 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये सातारा, धुळे, नांदेड, अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी, नंदूरबार, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश केला आहे.
पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भवती मातांची नोंदणी करणे, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती, मुलींचे वाढदिवस साजरे करणे, मुला-मुलींची संख्या सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे व मुलींच्या जन्मदराबाबत पथनाट्यांचे आयोजन या उपक्रमामुळे स्त्रीजन्माच्या दराचा टक्का वाढला आहे.
पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांतील लिंगगुणोत्तर प्रमाण (एक हजार मुलांच्या मागे)
बीड 922
जळगाव 903
नगर 907
बुलढाणा 939
औरंगाबाद 929
वाशिम 906
कोल्हापूर 893
उस्मानाबाद 908
सांगली 924
परभणी 947
लातूर 931
सोलापूर 921
पुणे 915
नाशिक 918
जालना 852
हिंगोली 869
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.