सोलापूर - पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोल पंपाद्वारे शुद्ध इंधनाबरोबरच विषमुक्त अन्नधान्य पुरवठ्याची योजना सुरू केली आहे. या योजनेबरोबरच जादुई पेटीचीही एक वेगळी कल्पना आखली आहे. या आगळावेगळ्या उपक्रमाने महिला, शेतकरी व ग्राहकांच्या माध्यमातून जनमानसाशी नाळ जोडली जात आहे.
सरकारने पोलिसांसाठी विविध पेट्रोलियम कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून (सीएसआर) पेट्रोल पंप मंजूर केले. या माध्यमातून मिळालेले उत्पन्न पोलिस कल्याण निधीसाठी जमा करण्यात येते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यामध्ये कल्पना लढविली. शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या उत्पादनांचे बाजारपेठ मिळावी, यासाठी पेट्रोल पंपाजवळील जागेत "ऍग्री मॉल' उभारला आहे. त्यात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली ज्वारी, गहू ही अन्नधान्ये, कडधान्ये, लाकडी घाण्याचे तेल, देशी गाईचे तूप, दूध, महिला बचत गटाची उत्पादने, गुलाब जल, फळे विक्रीसाठी ठेवलेली आहेत.
सोलापूर पोलिसांनी भारत पेट्रोलियमच्या सहकार्याने एक हजार स्क्वेअर फूट जागेवर मॉलची उभारणी केली. पायाभूत सुविधा, अंतर्गत सजावट करून घेतली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत भाजीपाला केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटाला एकत्रित आणून मॉल चालविण्यास दिला आहे.
ऍग्री एक्स्प्रेस व मॅजिक बॉक्स
'ऍग्री मॉल'वर जे ग्राहक येऊ शकत नाहीत अथवा ज्यांना घरपोच सेवा हवी आहे, अशांसाठी या मॉलमध्ये "न्यूट्रिशिअन मॅजिक बॉक्स'ची (निरामय आरोग्यासाठी जादूई पेटी) कल्पना सुरू करण्यात येत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच सेवा देता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण करण्यात आले. त्यांना ही योजना आवडली. त्यांनी गोदरेज संस्थेबरोबर बैठक घेऊन "बास्केट पॅटर्न मॅनेजमेंट सिस्टीम'बाबत मार्गदर्शन केले.
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळावी, तसेच महिला सक्षमीकरणासाठी कम्युनिटी पोलिसिंग म्हणून ऍग्री मॉल उभारण्यात आले आहे. यातून जनसामान्यांशी नाळ जोडण्याचा एक वेगळा प्रयोग केलेला आहे.
- वीरेश प्रभू, जिल्हा पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
|