101 कारखान्यांकडे 15 हजार कोटींची थकबाकी
सोलापूर - देशात साखर उद्योग भरभराटीला येत असतानाच कारखान्यांसमोर थकबाकीचे मोठे आव्हान उभे आहे. उत्पादन खर्च आणि सध्याच्या साखरेच्या दराच्या तुलनेत या वर्षी कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील नोंदणीकृत 202 सहकारी साखर कारखान्यांपैकी मागील वर्षी गाळप घेतलेल्या 101 कारखान्यांकडे तब्बल 14 हजार 859 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
राज्यात या वर्षी उत्पादित झालेल्या 160 लाख मेट्रिक टन साखरेपैकी सुमारे 99 मेट्रिक टन साखर शिल्लकच आहे. उत्पादनाचा अंदाज असतानाही शासनाने निर्यात अथवा बफर स्टॉकच्या निर्णयाला विलंब केला. सध्या बहुतांशी साखर कारखान्यांची साखर विक्री न केल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपीदेखील मिळालेली नाही. राज्यात यंदा सुमारे 10 लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. पुढील गाळप हंगामातही मोठ्या प्रमाणावर साखेरचे उत्पादन होणार आहे. मात्र, साखर विकायची कुठे आणि शेतकऱ्यांचे पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न कारखान्यांसमोर राहणार आहे.
शासकीय कर्जाचे होणार पुनर्गठन
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडील शासकीय कर्जाचे पुनर्गठन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी सरकारने राज्यातील बंद पडलेले (आजारी) सहकारी साखर कारखाने सुरू करण्याकरिता सहा डिसेंबर 2016 मध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. परंतु, सद्यःस्थिती पाहता ती समितीच आजारी पडल्याची चर्चा आहे.
नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने - 202
गाळप घेतलेले कारखाने - 101
थकबाकीदार कारखाने - 101
कर्जाची थकबाकी - 14,859 कोटी
शासनाची थकबाकी - 1,765 कोटी
बॅंकांच्या कर्जाची थकबाकी - 13,094 कोटी
|