पोहेगाव - काकडी (ता. कोपरगाव) येथील धावपट्टीवरून विमान घसरल्याच्या घटनेची दखल घेत दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) तीन सदस्यांनी आज येथे येऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार आहेत. मुंबईहून येणारे विमान कायम होते. मात्र, हैदराबादहून येणारे विमान आजही रद्द करण्यात आले.
मुंबईहून काकडीला येणारे विमान काल (सोमवारी) सायंकाळी साडेचार वाजता धावपट्टीवरून घसरले होते. ते आज तेथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रद्द केलेली विमानसेवा आज सुरळीत झाली. सध्या काकडीतून मुंबई व हैदराबादसाठी विमानांची प्रत्येकी एक फेरी होते. वैमानिकाचे विमानाच्या गतीवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येते. मूळ धावपट्टीवर विमान लॅंड होण्याऐवजी रेखाक्षेत्रासाठी उभारलेल्या विस्तारित धावपट्टीच्या पुढे ते गेले. याबाबत माहिती मिळताच "डीजीसीए'च्या तीन सदस्यांनी येथे येऊन धावपट्टीची पाहणी केली. अधिकाऱ्यांची चार तास चौकशी केली.
विमान योग्य जागी लॅंड न झाल्याने हा प्रकार झाला; मात्र, त्यात कोणतीही हानी झालेली नाही. या घटनेचा अहवाल मागितला आहे. विमानतळ विकास कंपनीतर्फे या घटनेच्या चौकशीची मागणी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली होती. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत वैमानिकाची चूक दिसते. मात्र, चौकशी अहवाल आल्यानंतरच नेमकी चूक कोणाची होती, हे कळेल.
- सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी
|