सोलापूर - ज्या कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर पूर्वी भ्रष्टाचाराचे, खंडणीचे गुन्हे दाखल होते, त्याच कार्यकर्त्यांना अन् नेत्यांना भाजपचे नेते शुद्धीकरण करून पक्षात घेऊ लागले आहेत. भाजप नेत्यांच्या या शुद्धीकरणामुळे मूळच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये व आरएसएसमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, 'खादी मंडळाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधीजी यांचे छायाचित्र काढून स्वतःचे छायाचित्र लावण्याएवढे पंतप्रधान मोठे झाले आहेत का?'' शिवसेना एकीकडे आपल्या मुखपत्रात टीकेचे अग्रलेख लिहिते, नेतेही भाजपवर टीका करतात आणि सत्तेला चिकटून राहतात. जनता दुधखुळी नाही. भाजपसोबत पटत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा, असे आव्हानही अजित पवार यांनी दिले.
नगर परिषद निवडणुकीत ज्या वेळी मतदान झाले, त्या वेळी नोटाबंदीला पन्नास दिवस पूर्ण झाले नव्हते. पन्नास दिवसांत काही तरी चमत्कार होईल असा दावा केंद्र सरकारने केला होता, त्यामुळे या निवडणुकीत जनतेने भाजपला मतदान केले. आता पन्नास दिवस झाले आहेत. या कालावधीत मध्ये काहीच साध्य झाले नाही. काळा पैसा रोखता आला नाही, दहशतवादही थांबला नाही, सरकारचा हा निर्णय अपयशी ठरला आहे. येत्या काळात एक कोटी नोकऱ्या कमी होणार आहेत, देशाचा विकासदर घटेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.
लोकसभेच्या उलट महापालिका निवडणूक
लोकसभा निवडणुकीत 75 टक्के पक्ष व 25 टक्के उमेदवार पाहिला जातो, हेच गणित विधानसभा निवडणुकीत पन्नास टक्के उमेदवार व पन्नास टक्के पक्ष म्हणून पाहिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र 25 टक्के पक्ष आणि 75 टक्के उमेदवाराकडे पाहून मतदान होत असल्याचे लॉजिक अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत मांडले. हे लॉजिक माझे असल्याचाही निर्वाळा पवारांनी दिला.
|