सांगली - ज्येष्ठ विचारवंत व धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. यापूर्वी त्याच हस्ताक्षरातील तीन पत्रे त्यांना पाठवण्यात आली आहेत. गेल्या वर्ष- दीड वर्षापासून त्यांना अशी पत्रे पाठवून धमकावले जात असून, शासनाने त्यांना पोलिस संरक्षण दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी डॉ. पाटणकर यांच्या कासेगावच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेल्या या पत्रात उत्तर प्रदेशमधील निकालांचा संदर्भ देऊन पुन्हा एकदा इशारा दिला आहे. "हिंदूंना झोडपणाऱ्या निधर्मी (?), पुरोगामी (?) राजकीय पक्षांना जनतेने लोकशाही मार्गाने गाडून टाकले आहे, हे लक्षात ठेवा,' असा इशारा देतानाच तुम्हाला विचारवंत म्हणायचे असेल तर ओवेसी झाकीर नाईक यांनापण विचारवंत म्हणावे लागेल, असेही या पत्रात म्हटले आहे.
डॉ. पाटणकर "सकाळ'शी बोलताना म्हणाले, 'गोविंदराव पानसरे यांच्या हत्येआधीही मला दोन पत्रे आली होती. मात्र त्यांची दखल मी घेतली नव्हती. पानसरेंच्या हत्येनंतर एका महिन्याने त्याच हस्ताक्षरातील तिसरे पत्र आले. त्यानंतर मी ते पोलिसांकडे दिले. मध्यंतरी एक टाइप केलेले आधीच्या पत्रांबद्दल माफी मागणारेही पत्र आले होते. आताच्या पत्राचा संदर्भ उत्तर प्रदेशच्या निकालाशी आहे. हे पत्र पहिल्या दोन हस्ताक्षरांतीलच आहे. या पत्रात उत्तर प्रदेशच्या विजयाची गुर्मी दिसते. मी अशा धमक्यांना भीक घालत नाही.''
|