कृष्णाकाठच्या गावांत सांडपाणी प्रक्रिया राबवू

कृष्णाकाठच्या गावांत सांडपाणी प्रक्रिया राबवू

सातारा - कचरा आणि सांडपाणी या दोन समस्या प्रामुख्याने आरोग्यावर घातक परिणाम करत आहेत. त्या सोडविण्यासाठी वर्षभर प्रयत्न केले असून, पहिल्या टप्प्यात घनकचरा व्यवस्थापनास यश मिळत आहे. जिल्ह्यात १४७ प्रकल्प पूर्णत्वाला गेले असून, त्यातून उत्पन्नही सुरू झाले आहे. आता कृष्णा नदीकाठच्या गावांत सांडपाणी प्रक्रिया उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ‘कॉफी वुईथ सकाळ’ या उपक्रमात दिली.

डॉ. शिंदे यांची ‘सीईओ’पदी नियुक्‍ती होऊन नुकतीच वर्षपूर्ती झाली. रूजू होताना त्यांनी आरोग्य आणि शिक्षणावर प्राधान्याने भर देणार असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले होते. त्यांनी वर्षभर राबविलेल्या उपाययोजना, कामकाजावर त्यांनी ‘सकाळ’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘कचऱ्याप्रमाणे सांडपाणी थेट जलस्त्रोतांत मिसळणे, ही समस्या गंभीर बनली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वांत मोठी नदी कृष्णा असून, त्यातही सांडपाणी मिसळते. या नदीकाठावरील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी ८२ कोटींचा आराखडा बनविला असून, तो शासनाकडे सादर केला आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण याला धोरणात्मक प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, सध्या सिमेंट, डांबरी रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे.’’

आयएएस प्रशिक्षणासाठी दक्षिण कोरियात गेल्यानंतर तेथे स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक चांगल्या बाबी पाहण्यास मिळाल्या. त्यात दक्षिण कोरियाने कचऱ्याची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विल्हेवाट लावून त्यापासून वीजनिर्मिती केलेली आहे. 

आपल्या राज्यात पेट्रोल पंपांवरील शौचालये खासगी लोकांसाठी खुली केली असून, आता त्यापुढे जावून नागरी भागांमध्येही खासगी शौचालये सार्वजनिक करणे, त्यांना देखभाल दुरुस्तीसाठी निधी देणे, यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. ग्रामीण भागातही कचरा ही समस्या प्रचंड वाढलेली आहे. जिल्ह्यातील २१७ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवला जात आहे. काही ग्रामपंचायतींनी गांडूळ खतनिर्मिती केली असून, त्याद्वारे ११ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शहरालगतच्या खेड, शाहूपुरी, कोडोली, शिरवळ, उंब्रज, सैदापूर या मोठ्या गावांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. 

पूर्वी साथीच्या रोगांमुळे मृत्यू जास्त होत असत. आता मात्र जीवनशैली बदलली असून, अयोग्य पाणी पिणे, खाणे यातून आजार जडून ६० टक्‍के मृत्यू होत आहेत. जिल्ह्यात ३३ लाखांपैकी ३० वयोगटांवरील दहा लाख लोक असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करत आहोत. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यासाठी ५० बीएचएमएस डॉक्‍टर नियुक्‍त केले असून, अजून ४७ डॉक्‍टरांची नियुक्‍ती केली जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षाही घेणार आहोत, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

मी आहे म्हणून कामे झाली, असे वाटले नाही पाहिजे. मी बदलून गेलो तरीही ही कामे पुढे सुरूच राहिली पाहिजेत, तर त्या कामांचा उपयोग. टीमवर्क असल्यामुळेच विकासकामे करता येत आहेत.
- डॉ. कैलास शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com