महावितरणची स्वेच्छानिवृत्ती योजना

महावितरणची स्वेच्छानिवृत्ती योजना

एप्रिलपासून लागू - पाल्यासाठी नोकरीचा पर्याय; वर्ग ३, ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी लागू

कोल्हापूर - महावितरणने वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी एक एप्रिलपासून मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ४५ वर्षे पूर्ण झाले आहे, अशांना यात सहभागी होता येईल. लाईनमन, फोरमन, मुख्य, प्रधान, वरिष्ठ तंत्रज्ञांसाठी ही योजना आहे. 

आजारपण, अपघात तसेच अन्य कारणांमुळे फिल्डवरील जे कर्मचारी काम करू शकत नाहीत, अशांसाठी ही योजना आहे. वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांचे वय कमीत कमी ४५ तसेच ५३ वर्षेपर्यंत असावे. वर्ग ४ साठी ४५ ते ५५ अशी वयाची अट आहे. 

स्वेच्छानिवृत्तीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. ‘दैनंदिन काम सुरळीत पार पडू शकत नाही’, अशा आशयाचे प्रमाणपत्र असावे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांसाठी ‘विद्युत सहायक’ हा पर्याय कायम ठेवता येईल. संबंधितांचा पाल्य हा दहावी, बारावी उत्तीर्ण नंतर इलेक्‍ट्रिकल वायरमनचा आयटीआय कोर्स, अथवा राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. ज्यांना मुलांसाठी नोकरी नको आहे, अशा कर्मचाऱ्यांना सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचा पगार आणि सेवानिवृत्तीपूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचा पगार मिळेल. जास्तीत जास्त १५ लाखांपर्यंत ही रक्कम असेल. 

ज्या कर्मचाऱ्यांना पाल्यासाठी नोकरीचा पर्याय ठेवायचा आहे, अशांच्या पाल्यांनी दहावी, बारावीनंतर तीन वर्षात इलेक्‍ट्रिकल अथवा वायरमनचा कोर्स पूर्ण करणे आवश्‍यक आहे. या कालावधीत संबंधितांनी कंपनीचे काम करणे अपेक्षित नाही. कार्यालयीन कामादिवशी संबंधित विभाग अथवा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावी.

तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी सात हजार पाचशे रुपये वेतन मिळेल. शैक्षणिक पात्रतेनंतर विद्युत सहायक या पदावर नियुक्ती होईल. नंतर तीन वर्षांसाठी सात हजार पाचशे, दुसऱ्या वर्षी आठ हजार पाचशे आणि तिसऱ्या वर्षी नऊ हजार पाचशे असे वेतन मिळेल.

जागा रिक्त होतील तशा नियुक्त्या 
जागा रिक्त होतील तसे तंत्रज्ञ या पदावर नियुक्त्या होतील. त्यासाठी महावितरणच्या नियम व अटी लागू राहतील. ज्या कर्मचाऱ्यांची मुले तीन वर्षाच्या आत शैक्षणिक पात्रता पूर्ण करणार नाहीत, अशांना एकूण वेतनातून रक्कम कपात करून उर्वरित रक्कम दिली जाईल. त्यावर व्याज मिळणार नाही. योजनेत सहभागासाठी मुलांचे वय १८ ते २७ (मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे शिथिल) पर्यंत असावे. एक एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत सहभागी होता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com