सोलापूर - मुख्यमंत्री गवगवा करीत असलेल्या जलयुक्त योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असा कैवार घेणाऱ्या सरकारने तुरीच्या बाबतीत शेतकऱ्यांची लूट केली आहे. त्यामुळे कृतीपेक्षा फक्त भपकेबाजपणावर भर असल्यामुळे फडणवीस सरकार म्हणजे आकाशवाणी केंद्र असल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी केली.
आमदार कडू यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यानिमित्त ते आज सोलापुरात आले होते. त्या वेळी ते म्हणाले, 'राज्यात 13 हजार रुपये क्विंटलने यापूर्वी शेतकऱ्यांची तूर विकली जात होती. सरकार शेतकऱ्यांना 13 हजारावरून केवळ पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देऊन लूट करत आहे. एकीकडे अशी स्थिती असताना हमीभावाने तूर खरेदी केल्याचा कांगावा सरकार करत आहे.''
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाना साधताना ते म्हणाले, 'यापूर्वी 15 वर्षे सत्तेत राहिलेल्या या दोन्ही पक्षांनी स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असतानाही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी संघर्ष यात्रा काढली. खरेतर या दोन्ही पक्षांच्या विरोधात संघर्ष करण्याची गरज आहे.''
दानवेंना चोपणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात काढलेल्या वक्तव्यावर बोलताना कडू म्हणाले, की त्यानंतर ते भेटले नाहीत. जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा त्यांना चोपून काढू. यापुढे काहीही सहन करणार नसल्याचेही कडू यांनी सांगितले.
कांबळे यांची गाडी काळी करणार
सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अपंगांना सहाशेवरून एक हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन आम्हाला दिले होते. मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. त्यामुळे याचा निषेध म्हणून कांबळे यांची गाडी काळी करणार असल्याचेही आमदार कडू यांनी सांगितले.
|